प्रभात वृत्तसेवा पुणे – एकीकडे शेतकऱ्यांना युरियासाठी वणवण भटकावे लागत असताना या वर्षीच्या खरीप हंगामात महाराष्ट्रात कुठेही युरिया किंवा रासायनिक खतांचा तुटवडा नसून गेल्या पाच वर्षात राज्यात आवश्यकता किंवा वापरापेक्षा जास्त युरियाचा साठा उपलब्ध होता, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. काँग्रेसचे लोकसभा खासदार शिवाजी काळगे यांनी याबद्दल प्रश्न विचारला असता केंद्राकडून हे उत्तर देण्यात आले. यानंतर केंद्राकडून सरळसरळ दिशाभूल केली जात असल्याचे जाणकारांनी म्हटले. महाराष्ट्रासह संपुर्ण भारतात खरिप हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यासोबतच रासायनिक खतांना आणि विशेष करून युरियाला मोठी मागणी असते. मात्र, गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना पुरेसा युरिया मिळत नसल्याची तक्रार सातत्याने होत आहे. कृषीसेवा केंद्रावर युरियाची मागणी केली असता विक्रेत्यांकडून इतर खतांच्या खरेदीची अट शेतकऱ्यांना घातली जाते. इतर रासायनिक खतांची एक प्रकारे युरियाची लिंकिंग केली असल्याने युरियासाठी शेतकऱ्यांना अनावश्यक अशा महागड्या खतांची खरेदी करावी लागते. याबद्दल विचारले असता खत कंपन्यांकडून युरिया घेताना इतर प्रकारची खते विकत घेण्याची अट घातली जात असल्याचे स्पष्टीकरण विक्रेते देतात. त्यांच्याकडे असलेल्या महागड्या खतांच्या विक्रीसाठी नाईलाजाने त्यांना शेतकऱ्यांना अशी अट घालावी लागत असल्याचे विक्रेते सांगतात. शेतकऱ्यांनी महागड्या खतांची खरेदी केली तरी त्याला आवश्यक इतका युरिया मिळेलचं याची शाश्वती नसते. बहुतांश वेळा शेतकऱ्याला आवश्यकतेपेक्षा कमी युरियावर समाधान मानावे लागते. २०२५ च्या खरीप हंगामाची स्थितीदेखील अशीच आहे. अशात केंद्र सरकारकडून संसदेत दिलेल्या उत्तरात राज्यासह संपुर्ण देशात पुरेसा खत पुरवठा झाला असल्याचे म्हटले आहे. “सरकारकडून संसदेत देण्यात आलेली माहिती म्हणजे सरळ सरळ दिशाभूल आहे. राज्यात युरियाची टंचाई असून जो युरिया मिळतो तो देखील लिंकिंग केलेला आहे. हा युरिया घेण्यासाठी शेतकऱ्यांना खप न होणारी आणि गरज नसलेली रासायनिक खतं विकत घेण्यास भाग पाडलं जात आहे”. -राजू शेट्टी, स्वाभीमानी शेतकरी संघटना युरियाबद्दल केंद्राने दिलेली माहिती. (आकडेवारी लाख टनात) वर्ष – आवश्यकता – उपलब्धता – वापर -२०२४-२५ – २३.७३ – ३२.७२ – २६.४१ -२०२३-२४ – २३.७४ – ३१.०६ – २३.४८ -२०२२-२३ – २५.२९ – ३०.३९ – २४.६६ -२०२१-२२ – २५.५० – २८.२९ – २३.६८ -२०२०-२१ – २५.०० – २९.७६ – २६.६२