मुंबई – केंद्र सरकारने सुशांतसिंह प्रकरण पुढे करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कट रचला होता, तो आता उघड झाला आहे, असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. या कटात कोणाकोणाचा सहभाग होता याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी अशी मागणीही कॉंग्रेस पक्षाने केली आहे.
एम्सच्या समितीने सुशांतसिंह याची हत्या झालेली नाही, तर त्याने आत्महत्याच केली आहे असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. त्यावरून कॉंग्रेसने भाजपवर हा आरोप केला आहे.
सुशांतवर विष प्रयोगही झालेला नाही असाही अहवाल एम्सच्या समितीने या आधीच दिला आहे याकडेही कॉंग्रेसने लक्ष वेधले आहे. याचा संदर्भ देऊन कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, एम्सचा आज जो अहवाल जाहीर झाला आहे त्यावरून मुंबई पोलिस या प्रकरणाची जी चौकशी करीत होते आणि त्यांचे जे निष्कर्ष होते ते खरे ठरले आहेत.
महाराष्ट्रातील हस्तक आणि बोगस मीडियाला हाताशी धरून महाराष्ट्राच्या बदनामीची मोहीम मोदी सरकारने चालवली होती हे यावरून स्पष्ट झाले आहे असे ते म्हणाले. राज्य सरकारने आता एक एसआयटी स्थापन करून महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या कटात कोणकोण सामील होते याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही सावंत यांनी केली.
दरम्यान, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सावंत यांचा आरोप अमान्य केला आहे. ते म्हणाले की, आमचा हेतू केवळ सुशांतसिंह याला न्याय मिळावा एवढाच होता. या प्रकरणात निष्कर्ष काढण्याची एकदम घाई कशाला पूर्ण अहवाल समोर येऊ द्या अशी प्रतिक्रियाही त्यांनी नोंदवली आहे.