कलंदर : उत्तम पिंगळे
विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही, वेताळाला खांद्यावर घेऊन चालू लागला. वेताळ म्हणाला, राजा मी काय म्हणतो ते नीट ऐक फक्त तू मध्ये बोलणार नाहीस. जर तू मध्येच बोललास तर मी पुन्हा झाडांवर पळून जाईल. वेताळ म्हणाला, राजा विज्ञानामुळे अन्नधान्य, वाहतूक, दळणवळण यात क्रांती घडून झालेल्या प्रगतीची आपण कल्पनाच करू शकत नाही. गावागावांत टीव्ही पोहोचला आहे. टेलिफोनची जागा मोबाइलने घेतली आहे. मोबाइल स्काइपच्या आधाराने प्रत्यक्ष पाहून बोलू शकतो. विविध सणांच्या शुभेच्छा जगभर पोहोचवल्या जातात. आपले नातलग प्रत्यक्ष सहभागी होत नसले तरी या माध्यमांतून संपर्क साधू शकतो. आता भाऊबीज, रक्षाबंधन अशा वेळी जर भाऊ सैन्यात असेल व येऊ शकत नसेल तरी बहीण मोबाइलच्या माध्यमातून प्रत्यक्ष बोलू शकते. थेट बॅंकेत पैसे वा कुरिअरने त्याच दिवशी भेट पोहोचते.
सोशल मीडियामुळे एकमेकांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, विविध दिन यांच्या शुभेच्छा दिल्या जातात. एवढी प्रचंड प्रगती केली आहे. जग एका छोट्याशा मोबाइलमुळे आपल्या हातात सामावले आहे, असे नाही वाटत का तुला? विक्रम यावर हसून म्हणाला की, तू जे म्हणतोस ती प्रगती मी निश्चितच नाकारत नाही. पण म्हणतात ना अति परिचयात अवज्ञा तसे झाले आहे. मोबाइल व्हॉटस् ऍपवर शुभ सकाळपासून शुभरात्रीपर्यंत निरर्थक मेसेजेस असतात. कित्येक मेसेजेस पाहिलेही जात नाहीत. अशा वेळी एखादा महत्त्वाचा संदेश द्यायचा असेल तर तो पाहिला जात नाही.
पूर्वी लिमिटेड होते, त्याची किंमत वाटत होती. आता अनलिमिटेड होऊन लिमिटेशन्स आली आहेत. उगाच काहीही साजरे करण्याचे स्तोम माजवले जात आहे. भाऊबीज, रक्षाबंधन एवढेच काय सारेच कमर्शिअल होऊ घातले आहे. विविध गिफ्टच्या जाहिराती मोबाइलवर येत असतात. फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाइन डे, हजबंडस् डे, वाईफस् डे, रोज काही ना काही असतेच. पूर्वी हे सारे साधेपणाने होत असे व त्यात संस्कृती असे. आता सारखा भपकेपणा नव्हता. नातेवाईकांचा फोन आपल्या शेजारी आला तरी किती आनंद असे. आता मोबाइल असून अनरिचेबल सहज होऊ शकतात. विविध कंपन्या, हॉटेल्स, बॅंका यांची मोठी चेन बनली असून ती जाहिरातबाजी करून जनतेला सेलिब्रेशन करण्यास प्रवृत्त करत असते.
मग काहीही असले तरी लगेच हॉटेलिंग करायचे.वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, पन्नाशी, साठी हे हॉटेलमध्ये साजरे करून बडेजाव मिळवण्यात येतो. लोकांशी मैत्री असलेली तसेच हजारो फेसबुक फ्रेंड असणारी व्यक्ती आपल्या सख्ख्या नातलगांशी कशी वागते ते नीट पाहा. विविध प्रकारच्या जाहिरातीने आशा व्यापारी संस्था सामान्यांना सेलिब्रेशन करण्यास प्रवृत्त करत आहेत व सेलिब्रेशन एक स्टेटस झाले आहे. असे सण उत्सव आपण नातेवाईक, मित्रांच्या प्रत्यक्ष घरी सहभागी होऊन साजरे करू शकत नाही का? पूर्वी रामायण, महाभारत एका टीव्हीवर पाहण्यासाठी घरातलेच काय जवळचे, गल्लीतील सर्व येत असत. आता घरातच दोन-तीन टीव्ही झाले आहेत. वेताळा एक लक्षात घे की, मोबाइल क्रांती झाली असली व जग जरी जवळ आले असले तरी वैयक्तिक मनुष्य एकटा पडून या व्यावसायिक महासागरात हरवत चालला आहे. विक्रमाचे उत्तर ऐकून वेताळ म्हणाला, हे राजा तू म्हणतोस तेच सत्य आहे. पण राजा तू बोललास त्यामुळे हा मी निघालो, असे म्हणून वेताळ पुन्हा झाडावर जाऊन लोंबकळू लागला.