हिमांशू
सो… हाऊ आर यू? कसा झाला मराठी राजभाषा दिन? एन्जॉइड ना? काय मस्त-मस्त मेसेज आले ना? दिवसभर फक्त मराठी, मराठी अँड मराठी सुरू होतं. राज्य सरकारनं एक दिवस आधीच मोठ्ठा डिसीजन घेतला. महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी शिकवलीच पाहिजे. अगदी कम्पल्सरी! मुख्यमंत्री पण काय सॉलिड बोलले ना? म्हणाले, मोगल आणि इंग्रजही मराठी भाषेला संपवू शकले नाहीत. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून शत्रूची पळापळ व्हायची. त्या मराठीचं वाकडं करण्याची कुणाची “टाप’ आहे, असं विचारलं. ग्रेट ना? “टाप’ शब्द असा डबल मीनिंग वापरता येतो, हे ठाऊकच नव्हतं, होय ना?
तिकडे मराठीतले नेहमीचे प्रचलित राजकीय वाक्प्रचारसुद्धा न चुकता ऐकायला मिळाले. तेही आझाद मैदानावरून. विरोधी पक्षही मराठीच ना? माजी मुख्यमंत्र्यांनी निषेध मोर्चा काढला आणि ठणकावलं, “”आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत.” वाह! क्या बात है! खरं तर बांगड्या भरणारे हातच बाळाला घडवतात आणि काही वर्षांनी ते बाळच मग “बांगड्या भरलेल्या नाहीत,’ असं म्हणण्यायोग्य होतं, या वास्तवाचाही विसर पडावा हेच खरं भाषासौंदर्य! भाषेलासुद्धा आपण “माय’मराठी म्हणतो आणि लहानपणी डोक्यावरून फिरलेल्या आईच्या हातातल्या बांगड्यांचा विसर पडतो, तेव्हा आपण कर्तृत्ववान होतो. म्हणूनच मराठी मंडळींनी हा वाक्प्रचार संधी मिळताच वापरायला हवा.
नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळीकडे मराठीची धूम होती. गायक शंकर महादेवन यांना रस्त्यावरून विठ्ठलाची गाणी म्हणत चाललेला वासुदेव चक्क मुंबईत दिसला. इमारतीतून खाली रस्त्यावर येऊन ते वासुदेवाला भेटले. त्याची गाणी ऐकली. दुसरीकडे राज ठाकरे यांनी “रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ हा ज्ञानेश्वरांचा अभंग म्हणणाऱ्या काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ शेअर केला. खरं तर त्यासोबत त्यांनी दिलेला संदेश अतिशय महत्त्वाचा होता. “हे गाणं आपल्या राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो,’ असं ते म्हणाले. तिकडे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन यांनी त्यांच्या छोट्याशा मुलीचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत त्यांची मुलगी मराठीतून भाषण करताना दिसतेय. शिक्षकांना आणि वर्गमित्रांना तिनं मराठी भाषादिनाच्या मराठीतून दिलेल्या मनःपूर्वक शुभेच्छा किती हृदयस्पर्शी होत्या ना!
थोडक्यात, मराठी भाषा आता पूर्वीसारखी केविलवाणी राहिलेली नाही. माणूस मराठी असो वा अमराठी, सगळ्यांना आता मराठीची दखल घ्यावीच लागते. हल्ली बॉलिवूडच्या सिनेमातसुद्धा मराठी संवाद अधूनमधून ऐकायला मिळतातच. आपण सगळ्यांनी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं का होईना, मराठीचं वाढतं वैभव डोळाभरून पाहिलं, याचा आनंद आहे. आपल्या मराठीचा आपल्यालाच विसर पडलाय, हे मात्र साफ खोटं!
आम्ही मराठी माणसं इंग्रजीच्या कच्छपी लागलो आणि आपली भाषा, आपली संस्कृती विसरलो, असा आक्षेप अनेकजण पूर्वीपासून घेतायत. पण तो काही खरा नव्हे. ज्ञानभाषा आत्मसात केली म्हणून आम्ही मातृभाषा विसरलो की काय? खरं तर मराठीच ज्ञानभाषा व्हायला हवी, हेही आता सगळ्यांना पटलंय. कारण ज्ञानभाषा म्हणून दाखवली गेलेली भाषा वस्तुतः “रोजगारभाषा’ होती, हे उशिरा का होईना सर्वांना समजलंय.
आता दरवर्षी मराठीचा उत्सव असाच दणक्यात साजरा करणार!