नवी दिल्ली: सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या काही विषयांच्या
परीक्षा बाकी आहेत. त्या परीक्षा 1 ते 15 जुलै या कालावधीत घेतल्या
जाणार होत्या. तथापि देशातील करोनाची स्थिती सध्या आणखी बिकट
झाल्यामुळे या परीक्षा घ्यायच्या की नाही यावर चर्चा सुरू असून त्याचा
अंतिम निर्णय उद्या बुधवारी घेतला जाईल अशी माहिती सीबीएसई बोर्ड
आणि केंद्र सरकारच्यावतीने आज सुप्रिम कोर्टात सांगण्यात आली.
करोनाच्या स्थितीत परीक्षा घेण्यास काही पालकांचा विरोध आहे, त्यामुळे
त्यांच्या मानसिक अवस्थेची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आम्ही त्यावर
उद्याच निर्णय घेऊ असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज
झालेल्या सुनावणीच्यावेळी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने या
विषयावरील पुढील सुनावणी 25 जून रोजी ठेवली आहे.