CBSC Board : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSC Board) आपल्या परीक्षा प्रणालीत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी २०२६ च्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आता पारंपारिक पद्धतीऐवजी ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ म्हणजेच डिजिटल पद्धतीने केले जाणार आहे. मात्र, इयत्ता १० वीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्वीप्रमाणेच प्रत्यक्ष पद्धतीने सुरू राहील, अशी माहिती सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिली. मूल्यांकन प्रक्रियेतील मानवी चुका टाळणे आणि निकालाची अचूकता वाढवणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पद्धतीमुळे गुणांच्या बेरजेत होणाऱ्या चुका पूर्णपणे संपुष्टात येतील आणि निकालोत्तर पडताळणीची गरज उरणार नाही. विशेष म्हणजे, या पद्धतीमुळे शिक्षकांना त्यांच्या स्वतःच्या शाळेत राहूनच मूल्यमापन कार्य पूर्ण करता येईल. ज्यामुळे त्यांच्या नियमित अध्यापन कार्यात कोणताही अडथळा येणार नाही. जगभरातील सीबीएसईशी संलग्न असलेल्या सर्व शाळांमधील शिक्षकांना या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची योजना बोर्डाने आखली आहे. या नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी सीबीएसईने सर्व शाळांना कडक सूचना दिल्या आहेत. शाळांना त्यांच्या संगणक प्रयोगशाळा अद्ययावत ठेवण्याचे, हाय-स्पीड इंटरनेट आणि अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, शिक्षकांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात आले आहे.