नवी दिल्ली : भारताला वाऱ्याप्रमाणे गतिमान असणारे ब्राम्हास्त्र प्राप्त होणार आहे. अर्थात भारताला फ्रान्सकडून अत्यंत घातक असा मारा करणारे राफेल हे लढाऊ विमान मिळणार आहे. राफेल विमानाची पहिली तुकडी या आठवड्यात भारतात दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या २७ जुलैपर्यंत राफेलचे विमान देशात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता राफेलच्या भारतात येण्यामुळे शेजारील राष्ट्रांची डोकेदुखी वाढणार असल्याचेही म्हटले जात आहे.
जगात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु आहे तर दुसरीकडे भारताचे शेजारील राष्ट्र हे घुसखोरी आणि दहशतवादी कृत्याला खतपानी घालताना दिसत आहे. त्यातही मागील काही दिवसांपासून चीनसोबत भारताचे संबंध अत्यंत तणावपूर्ण असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतात दाखल होणारे राफेल लढाऊ विमान हे चीन कडील सीमा रेषेवर तैनात केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सुरुवातील केवळ चार विमानांची तुकडी देशात दाखल होणार होती परंतु, भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या कारवाया पाहता फ्रान्सकडून आता ६ राफेल विमाने मागवण्यात आले आहेत. दरम्यान, लडाखमध्ये भारतीय सैनिक दिवसरात्र एक करून आपली युद्ध क्षमता वाढवत आहेत, त्यात हे राफेल विमान भारतीय लष्करासाठी मदतीचे ठरू शकते.