मुंबई : ‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अकस्मिक निधनामुळे उद्योग जगताला मोठा धक्का बसला. उद्योगविश्वासोबत इतर सर्वच क्षेत्रातून सायरस मिस्त्री यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचे नेमके कारण त्यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.
अहवालात नमूद केल्यानुसार, सायरस मिस्त्री यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे ब्रेन हॅमरेज होऊन मेंदूतून अतीरक्तस्त्राव झाला. छाती, डोके, मांडी आणि मानेत अनेक फ्रॅक्चर्स झाले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारची गंभीर इजा शरीराला बसलेल्या मोठ्या धक्क्यामुळे होऊ शकते. अशी इजा झाल्यास व्यक्तीचा लागलीच मृत्यू देखील ओढवू शकतो.
सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल हे दोघे कारच्या मागच्या सीटवर बसले होते. त्यांनी सीटबेल्ट लावला नसल्यामुळे अपघातामध्ये त्यांच्या शरीराला जबर दुखापत झाली.
हा अपघात कसा झाला यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली असून या अपघाताला अती वेग कारणीभूत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अपघात झाला तेव्हा गाडी फार वेगात होती असे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी पुलावर आली तेव्हा ती निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावत होती. तसेच गाडीच्या वेगाचा अंदाज चालकाला न आल्याने हा अपघात झाल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.