पाबळ : जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधीच मतदारांना तीर्थयात्रा घडवून आणण्यात यशस्वी झालेल्या उमेदवारामुळे पाबळ- केंदूर जिल्हा परिषद गटात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या वेट अँड वॉचचे धोरण सुरू असून कार्यकर्तेही संभ्रमात आले आहेत. निवडणूक आचारसंहिता लागण्यास मोजके दिवस उरले असतानाही चर्चेत आलेले राष्ट्रवादी भाजप, शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे दिग्गज उमेदवार अजूनही मतदारसंघात फिरण्यासाठी सक्रिय होत नसल्याने तसेच राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षातील फुटीमुळे तब्बल पाच पक्षांत विभागले गेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमुळे उमेदवारांमध्येही संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या गटात यावेळी पक्षफुटीमुळे मतदार विभागले गेले तसे कार्यकर्ते आणि उमेदवारही विभागले गेले आहेत. पाबळ गटाच्या सीमेवरील एका उमेदवाराने आपली प्रचार मोहीम राबवताना सर्वच पक्ष, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपलीच निवड योग्य ठरावी, अशा पद्धतीने यंत्रणा राबवली आहे. त्याचवेळी उमेदवारी जाहीर करताना विलंब होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उदासीनता आली आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, राजकीय डावपेचात माहीर असलेल्या पक्षांनाही किमान निवडणूक पूर्व पक्ष प्रचार करण्यासाठी संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात सक्रिय करता येत नसल्याची बाब पुढे येत आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीत पक्षाची भूमिका महत्वाची ठरत असली तरी यावेळी मात्र पक्षांमधील फूट निकष बदलवणारी ठरली असल्याने स्ट्राँग उमेदवार हाच निकष पुढे येत आहे. अशा परिस्थितीत स्ट्राँग उमेदवारानीच चुप्पी साधली असल्याने युद्धपूर्व शांतता भासत आहे. सद्य स्थितीत पक्षांची अगतिकता दिसून येत असल्याने जनतेत अथवा मतदारांपर्यंत आगेकूच करणाराला उमेदवारी, असा निकष ऐनवेळी पुढे केला गेल्यास प्रचाराचा धडाका लावून मतदारांपर्यंत पोहोचणारा तसेच कार्यकर्त्यांची फौज असलेल्या उमेदवारास जिल्हा परिषदेत सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रमुख पक्षाकडून आमंत्रण मिळण्याची दाट शक्यता आहे. पाबळ- केंदूर गट चर्चेत दरम्यान शिरूर आंबेगाव मतदारसंघात जोडण्यात आलेल्या 39 गावांतील तीन जिल्हा परिषद गटांपैकी टाकळी हाजी गटात दोन्ही राष्ट्रवादी पक्षात आणि रांजणगाव गटात राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपमध्ये लढती निश्चित झाल्या आहेत, अशा परिस्थितीत पाबळसह तिन्ही गटातील उमेदवार विजयी करण्यासाठी होणारी लढत महत्वाची ठरणार असल्याचे चित्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. पंचायत समितीचा उमेदवार महत्त्वाचा राष्ट्रवादी अजित पवार गटात जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारीबाबत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचाही शब्द अखेरचा असल्याने पाबळ गटातील उमेदवारी स्ट्राँग उमेदवाराला मिळण्याची दाट शक्यता आहे. पंचायत समितीच्या उमेदवारांची जोडणीही तितकीच महत्वाची ठरणार आहे, याबाबत पंचायत समिती अध्यक्षपद आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवण्याची संधी एकाचवेळी पाबळ गटासाठी निर्माण झाली आहे. या गटातून निवडून गेलेल्या उत्तम कामगिरी झालेल्या एका माजी सदस्यांवर मोठी जबाबदारी येणार असल्याची चर्चा आहे.