भोपाळ : मध्य प्रदेशातील मैहर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण त्रिपाठी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) उघडपणे विरोध केला आहे.
सीएए कायदा देशाला विभाजित करणारा कायदा असल्याचे त्रिपाठी म्हणाले. या कायद्यामुळे देशात कलहाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप सीएएच्या समर्थनार्थ कार्यक्रमांचे आयोजन करत असताना त्रिपाठी यांनी सीएएला उघडपणे विरोध केला आहे.
मंगळवारी त्रिपाठी पत्रकार परिषदेत म्हणाले कि, मी गावातून आलो आहे, माझ्या गावात मुस्लिम बांधव आहेत. बाबासाहेबानी राज्य घटनेत सांगितले आहे की सर्व धर्म समान आहे. देशात धर्माच्या आधारे, नागरिकत्वाच्या आधारे देशाला विभागले जाऊ शकत नाही. देशात बेरोजगारी, उपासमार, आरोग्याच्या समस्या आहेत पण त्याकडे सरकार लक्ष देत नसल्याची खंत त्यांनी वक्त केली.
या कायद्यामुळे गावातील बंधुता नष्ट होत आहे, परस्पर संबंध संपुष्टात येत आहेत. ज्या घरात भांडण होतात ते कधीही प्रगती करू शकत नाही. देशात घरगुती कलहाची परिस्थिती निर्माण आहे. कलह असेच वाढत राहिल्या परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते असे भाकीत त्यांनी केले.
पुढे बोलताना त्रिपाठी म्हणाले कि हे माझे व्यक्तिगत मत असून मला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. कोणताही पक्ष मला विचार मांडण्यापासून रोखू शकत नाही. पक्षाला कारवाई करायची असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.