SUCCESS STORY : ग्रामीण भागातील महिला आता खूप प्रगती करत आहेत.विशेषत: ग्रामीण महिला आपल्या नियोजन आणि मेहनतीने पडीक शेतीचे रूपांतर एका चांगल्या शेत जमिनीत करत आहेत. झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील गुडाबांधा ब्लॉक अंतर्गत भालकी पंचायत सुंदगी गावातील महिलांनी चमत्कार केला आहे. सुंदगी गावातील मोरडीह टोला येथील 300 महिलांनी त्यांच्या गावातील पाच एकर नापीक जमिनीचे सुपीक शेतात रूपांतर केले आहे.
महिलांनी सामूहिक एकतेतून श्रमदान करून हे यश मिळवले आहे. आज या जमिनीवर शेती केली जात असून त्यामुळे गावातील महिला स्वावलंबी होत आहेत. या कामासाठी आधी एकजूट हवी होती. ही गरज ओळखून महिलांनी प्रथम गावात आडे पाणी ग्राहक गट या नावाने संघटना स्थापन केली. यानंतर नापीक जमिनीचे शेतीत रूपांतर होऊन मिरची व वांग्याची लागवड सुरू झाली.
आज पाच एकर जमिनीत महिलांचे कष्ट फळाला आल्याचे पाहायला मिळत आहे. काही महिलांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले होते. मात्र, जमीन तयार केल्यानंतर या जमिनीवर शेतीसाठी सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे महिलांनी सांगितले.
सरकारी योजनांचा लाभ मिळाला
सिंचनासोबतच तांत्रिक ज्ञानाचा अभाव ही देखील त्यांच्यासाठी मोठी समस्या बनत असल्याचे महिलांनी सांगितले. पण त्या महिला शेतकऱ्यांमध्ये काहीतरी करण्याची हिंमत होती, म्हणून त्यांनी मागे वळून न पाहता सरकारी योजनांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला. महिलांची मेहनत पाहून त्यांना विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला. सोलर पंप योजनेचा लाभ घेत महिलांनी आपल्या शेतात सिंचनाची सोय करून वांग्याची लागवड केली. पहिल्या वर्षी चांगले उत्पादन पाहून महिलांनी दुसऱ्या वर्षी मिरचीची लागवड केली. एवढेच नाही तर जनावरांपासून शेतांचे संरक्षण करण्यासाठी शॉक फेन्सिंगही बसविण्यात आले आहे.
विभाग आणि स्वयंसेवी संस्थेचे सहकार्य मिळाले
या ग्रामीण महिलांना सरकारी योजना तसेच स्वयंसेवी संस्था आणि एफपीओकडून मदत मिळाली. या महिलांच्या तांत्रिक विकास आणि उत्पादन वाढीसाठी जिल्ह्यातील कृषी अधिकारी आणि संस्थेने एकत्रित सहकार्य केले. अशा प्रकारे या महिलांनी यश संपादन केले असून आज या महिला चांगली कमाई करून स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहेत. अशाप्रकारे या महिला आपल्या गावातील महिलांसाठी तसेच आजूबाजूच्या गावातील महिलांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत.