पूरपरिस्थिती टाळण्यासाठी पाऊल; मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
पुणे – पूरपरिस्थिती टाळण्यासाठी यंदा राज्यातील धरणांमध्ये ऑगस्टपर्यंत 70 टक्केच पाणीसाठा ठेवण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, तर धरणात पाणी साठवता येईल. तसेच विसर्गावर नियंत्रण शक्य होणार होऊन पूरपरिस्थिती टाळण्यास मदत होईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. दरम्यान, हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार आहे.
विधानभवन येथे पत्रकार परिषदेमध्ये वडेट्टीवार म्हणाले, “मागील काही वर्षांपासून अपुरा पाऊस आणि दुष्काळ लक्षात घेता सुरुवातीस धरणे 100 टक्के भरली जात होती. यानंतर विसर्ग केला जातो. मात्र, मागील वर्षी जादा पाऊस झाला. त्याआधीच धरणे 100 टक्के भरली होती. त्यामुळे विसर्ग वाढवताच काही जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली. यापार्श्वभूमीवर हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
सध्या काही धरणांमध्ये 15 ते 25 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. यंदा पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणीसाठा, एकूण पाऊस, धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याचा विचार करून ऑगस्टमध्ये धरणांमध्ये सुमारे 30 टक्के पाणी कमी ठेवण्यात येणार आहे, याविषयीची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देण्यात आली आहे.
“निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे विभागात झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यात आली. नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अलमट्टी धरणातील पाणीसाठा हे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूर येण्याच्या अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण आहे. अलमट्टी धरणातून किती विसर्ग करण्यात येतो, याची माहिती दिली जात नाही. त्या पाण्यासंदर्भातील वस्तुस्थिती मांडण्यात येणे अपेक्षित आहे.
– विश्वजित कदम, राज्यमंत्री.