Posted by Subodh Bhave : मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नाव अभिनेता सुबोध भावे याचा काल ५० वा वाढदिवस साजरा झाला. सुबोधने २५ वर्ष चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटत नावलौकिक मिळवले आहे. त्याच्या वाढदिवसाला कलाविश्वातील अनेकजण उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी देखील सुबोध भावेच्या वाढदिवसाला उपस्थित राहून त्याला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. सुबोधचे वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याने फेसबुकवरून पोस्ट शेअर करत मोठी कल्याणकारी घोषणा केली आहे. काल माझा 50 वा जन्मदिवस आणि कलेच्या क्षेत्रातला 25 वर्षांचा प्रवास एकत्र साजरा केला. अर्थात माझे कुटुंबीय उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व माध्यमातील माझे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, माझे सहकलाकार, पडद्यावरील व पडद्यामागील. ज्यांच्यामुळे मी घडतोय ते सर्व उपस्थित होते. त्याचबरोबर समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्ति ज्यांच्यामुळे मी अनेक गोष्टी शिकलो ते ही उपस्थित होते, असे सुबोधने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यासोबतच महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार जी, माझे जेष्ठ दिग्दर्शक गोविंद नीहलानी, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, मा.उद्धव ठाकरे साहेब, मा.राज ठाकरे साहेब, खासदार नरेश म्हस्के, सचिनजी, जेष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, अनेक पोलिस अधिकारी, न्यूज माध्यमातील अनेक मित्र. या सर्वांचे सुबोध भावेने आभार मानले आहेत. खरंतर आपण केलेली मदत जाहीर करायची नसते. पण या वेळेस मुद्दाम करतोय. गेली काही वर्षं करतच होतो, पण आता जे ठरवलय ते जाहीर करावसं वाटतय कारण त्यामुळे ज्या संस्थांसाठी आणि मुख्य म्हणजे माणसांसाठी करतोय त्यांना त्याचा फायदा व्हावा. 25 वर्ष अभिनेता म्हणून काम करतोय. समाजाप्रति आपली जबाबदारी ओळखून काम करतोय. पण आता त्याचा विस्तार करावासा वाटला, अशी भावना त्याने पोस्टमधून व्यक्त केली आहे. पुढे सुबोध म्हणाला, असं ठरवलं की 25 वर्ष मला काम करून झाली त्यामुळे पुढचे 25 महिने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या घटकांसाठी काम करणार्या सामाजिक संस्थाना आर्थिक सहाय्य करावे. त्याचा भाग म्हणून काल माझ्या जन्मदिनानिमित्त बीड जिल्ह्यात अनाथ मुलांसाठी काम करणार्या “शांतीवन ” या संस्थेच्या नागरगोजे सर यांना मा. सांस्कृतिक मंत्री आशिष जी शेलार यांच्या उपस्थितीत पहिला धनादेश दिला, असल्याची माहिती सुबोधने पोस्टद्वारे दिली आहे. आता दर महिन्याला एका सामाजिक संस्थेला हा धनादेश नियमित देण्यात येईल आणि त्या संस्थेची माहिती आणि बँक डिटेल्स ही देण्यात येतील. तुम्हालाही सहाय्य करावसं वाटलं तर जरूर करा, असे आवाहन सुबोधने केले आहे. शांतिवनसाठी आपण दिलेली मदत आयकर कायदा 80 G नुसार करमुक्त आहे. त्याची रितसर पावती आम्ही आपल्याकडे पाठवण्यात येईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार, असे सुबोधने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. हेही वाचा : “आमची गाडी अजूनही आमच्या दारातच, ‘त्या’ नंबरची गाडी आमची” ; अटक केलेल्या संशयिताच्या कुटुंबीयांचा दावा