कुणासाठी अन् कशासाठी हा जीवघेणा खेळ? थांब आता… बॅंकेतील मंगेश ठुबे नामक कर्मचाऱ्याची मागील महिन्यात संचालक बोर्डाने वेतनवाढ थांबविली. त्यात माझा काय संबंध? सदर कर्मचारी 2008 मध्ये गुरुकुल मंडळाच्या कार्यकाळात बडतर्फ करण्यात आला होता.
त्याचा बॅंकेविरुद्ध न्यायालयीन वाद सुरू होता. परंतु 2017 मध्ये तत्कालीन चेअरमन यांनी न्यायालयातील वाद मिटवून घेत त्या कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेतलं. बर तेही मान्य. जरी घेतलं पण, लगेच शिपाई पदावरून थेट लिपिक पदावर बढती दिली. न्यायालयाने त्याला शिपाई पदावर नियुक्ती द्यायला सांगितलं होतं.
परंतु नियुक्ती दिली लिपिकपदाची. ती देखील 8 हजार 560 वेतनावर. तरीही समाधान झालं नाही. अट्टाहासच केला. माझ्यासोबत लागलेल्या कर्मचाऱ्याप्रमाणेच माझं बेसिक पाहिजे…! या सदर कर्मचाऱ्याच्या “बालहट्टा’पायी त्याला बढती देऊन वेतनवाढी दिल्या अन् बेसिक अकरा हजार आठशेवर नेऊन ठेवलं. नेमकं त्यात बॅंकेचं किंवा सभासदाच कोणतं हित तत्कालीन चेअरमन यांनी बघितलं? हाही संशोधनाचा भाग. त्यावर त्यांच स्वत:च काय मत असेल, ते त्यांनाच माहीत. जर एखादा बडतर्फ शिक्षक पुन्हा हजर झाला, तर त्याला होता, त्याच पदावर काम करावं लागतं.
लगेच प्रमोशन मिळतं का? त्याच्यासोबतचे इतर शिक्षक तोपर्यंत बेसिकने पुढे जाणारच. म्हणून लगेच प्रशासन बडतर्फ कर्मचाऱ्याच बेसिक वाढवत नाही. मात्र, आपल्या बॅंकेत वेगळंच चित्र बघायला मिळालं. असो.! या निर्णयावर काही लोकांनी निबंधकाककडे तक्रारही केली. त्यावर कर्मचारी वेतनवाढ पडताळणी समिती नेमण्यात आली. अशा चुकीच्या पद्धतीने बढती देऊन दिलेल्या वेतनवाढी थांबविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्यात माझी एकट्याची काय चूक? चुकीच्या पद्धतीने झालं असेल, तर भरपाई होणारच.
झालेल्या चुका दुरुस्ती करण्याचा सर्वस्वी अधिकार संचालक बोर्डाला आहे आणि सर्व सभासदांना तो बांधील आहे. पण, यामागे बापू तांबेच आहे, असा समज. मित्रहो, मंगेश ठुबे बाबतीतच असं झालंय का? नाही. कर्तव्यात कसूर किंवा कामातील हलगर्जीपणाबद्दल बॅंकेतील अन्य कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीही संचालक बोर्डाने थांबविल्या आहेत. तरीही ते कर्मचारी त्यांचं काम करत आहेत.
बॅंकेतील चुकीच्या निर्णयांना सुधारणे, हे संचालक म्हणून त्यांचेही कर्तव्य आहे. परंतु त्यामागे मीच का दोषी? बॅंक सर्वांचीच आहे. अशा गोष्टीने माझ्यावर किंवा माझ्या परिवारावर काही संकट येत असेल, तर मी यातून बाहेर पडणेच आता मला योग्य वाटतंय. आज माझ्या घरापर्यंत ही वेळ आली असेल, तर अशा तुघलकी राजकारणातून संन्यास घेतलेला बरा. आतापर्यंत शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी समाजकारण म्हणून काम केलं.
दिलेल्या प्रत्येक पदाला माझ्या कामातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी मला काम करताना खूप मोठी साथही दिली. तुमचे सदैव माझ्यावर ऋण राहील.परंतु या घटनेनंतर माझं मन पूर्णत: खिन्न झालं आहे. काय करावं. भावनेनं मन व्याकुळ होतंय. असो. माझ्याकडून काही चुकीचं झालं असेल तर मला क्षमा असावी. एवढीच विनंती..। – बापू तांबे