नाशिक – बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून या शर्यतीच्या माध्यमातून आपापसात निर्माण होणारा एकोपा आणि प्रेम आपल्या सर्वांना माहित आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, आता कुठं तरी या शर्यती रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ घेत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात लम्पि आजाराचा प्रादुर्भाव असून यामुळे जनावरांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होत आहे.
दरम्यान, राज्यात लम्पीचा आजार आल्यानंतर शासनाकडून या आजारावर लसीकरण करण्यात आले. मात्र या लसीकरणाचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. आणि याच कारणामुळे आता काही ठिकाणी बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतंच नाशिकच्या ओझरमध्ये आयोजित केलेली बैलगाडा शर्यत आता रद्द करण्यात आली आहे. लम्पि आजाराच्या प्रादुर्भावामुळे ही शर्यत रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला असून प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर यावर विचार केला जाणार आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरवर्षी नाशिकजवळील ओझर परिसरात खंडोबा यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येते. खंडोबाची यात्रा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या जल्लोषात राज्यभरातून बैलगाडा शर्यत प्रेमी ओझर मध्ये दाखल होतात. मात्र, यंदाच्या वर्षी ही शर्यत रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून, नंतर यावर विचार केला जाईल असं देखील सांगितलं आहे. ही साथ फोफावत असल्याने ओझर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी आयोजकांनी बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय एक मुखाने घेतलेला आहे.
या धोकादाय आजारामुळे मागील काही दिवसात अनेक जनावरांचा मृत्यू ही झाला आहे. त्यामुळे या भागातील पशुधन धोक्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. शासन देखील या गंभीर आजारावर लसीकरण करत असून, या लसीकरणाचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.