Buldhana Bus Accident – समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसने पेट घेतल्याने या प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. यादरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती.
यावेळी या अपघाताबद्दल विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक वीरेंद्र धरणे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली की,’बस नागपूरहून ५ वाजता निघाली होती, यवतमाळचे ३, नागपूरचे ७ ते ८, वर्धा येथील १४ प्रवासी होते. बसची माहिती सांगताना ते म्हणाले,’ही बस आम्ही जानेवारी २०२० मध्ये विकत घेतली होती. लॉकडाऊनच्या काळात बस बंद होती. गाडीची कागदपत्रं व्यवस्थित होती. गाडीचा फिटनेस होता. गाडीचा इन्शुरन्स होता. गाडीवरचा चालक आहे तो जुना चालक आहे. तो अनुभवी चालक आहे, अशी माहिती देखील धरणे यांनी दिली. ते माध्यमांशी बोलतांना पुढे म्हणाले,’गाडीचा फिटनेस योग्य आहे, आताच केलेला आहे याबाबत शंका नाही. हा अपघात का झाला? समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका दिसत आहे. आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे. पूर्ण अपघाताची आम्ही शहानिशा करणार आहे.’ असेही ते म्हणाले आहे.
दरम्यान, या बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष (०७१२-२५६२६६८) अथवा अंकुश गावंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (८८६००१८८१७) यांच्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.