पिंपरी (प्रतिनिधी) – प्रदीर्घ लॉकडाउनमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये अनेक बदल केले जाणार आहे. या काळात नवी संकटे येणार असल्याने शहरातील हॉटेल व्यावसायिक व त्यावर अवलंबून असलेले कामगार हवालदिल झाले आहेत.
सलग दोन महिने शहरातील हॉटेल्स, परमिट रुम, लॉजिंग, उपहारगृहे, नाष्टा सेंटर्स, रस्त्यावरील खाद्यविक्री व्यवसाय बंद आहेत. हॉटेल व्यवसाय शासनाला दहा टक्के महसूल मिळवून देतो. मात्र या व्यवसायासमोरील अडचणी सोडविण्यासाठी शासनाने अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही. सध्या पार्सल व्यवस्था सुरु असली तरी शहरातील केवळ दहा टक्के व्यावसायिक ही सेवा देत आहेत. त्यामध्येही वेळेची किचकट अट असल्याने अनेकांनी ती बंद केली आहे.
लॉकडाउनदरम्यान हॉटेल व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकारची शिथिलता मिळालेली नाही. भविष्यात ती मिळाली तरी, या व्यवसायाचे स्वरुप नव्या नियमांमुळे बदलणार आहे. सुरक्षित अंतराची अट पाळण्यासाठी हॉटेलचालकांना त्यांच्या टेबलची संख्या सुमारे 50 टक्क्यांपर्यंत कमी करावी लागणार आहे. त्यामुळे तेवढ्या कामगारांची संख्या कमी होऊन बेरोजगारी वाढणार आहे. कामगारांच्या कुटंबियांचा विचार केल्यास सुमारे 30 हजार लोकांना या व्यवसायाचा आधार आहे. तितक्या लोकांना याचा फटका बसणार आहे.
सुरक्षित अंतरासह स्वच्छतेवर अधिक खर्च करावा लागणार आहे. वाढत्या खर्चानुसार हॉटेलमधील ग्राहकांची संख्या वाढेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायासाठी खर्च वाढणार आहे.
कोणतेही संकट आले तरी त्यामध्ये हॉटेल व्यावसायिकांचा सहानूभूतीपूर्वक विचार केला जात नाही. बंद काळातही अनेक खर्च करावे लागतात. त्या बदल्यात उत्पन्न काहीच नसते. त्यामुळे कर्जबाजारी होण्याशिवाय पर्याय नाही. अन्य व्यावसायिकांना जसे नियम घालून परवानग्या दिल्या आहेत. तशा हॉटेल व्यावसायिकांना ही देण्यात याव्यात.
-अरुण मिश्रा, हॉटेल व्यावसायिक