फायबर केबलची लांबी, टॉवरची संख्या वाढणार
पुणे – देशातील सर्व खेड्यांमध्ये 2022 पर्यंत ब्रॉडबॅंड सेवा उपलब्ध व्हावी, याकरिता राष्ट्रीय ब्रॉडबॅंड मोहीम सुरू केली आहे. यासाठी 7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूूक करण्यात येणार आहे.
देशभरातील सर्वसामान्य लोकांना डिजिटल सेवा कार्यक्षम रित्या मिळाव्या, असा या ब्रॉडबॅंड मोहिमेचा उद्देश आहे. यासाठी 30 लाख किलोमीटर फायबर केबल टाकण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना मोबाइल सेवा कार्यक्षमरित्या उपलब्ध होणार आहे.
सध्या देशभरामध्ये साधारणपणे 5 लाख 65 हजार मोबाइल टॉवर आहेत. ही संख्या 10 लाखांपर्यंत वाढणार आहे. सध्या देशात 1000 लोकामागे केवळ 0.42 टॉवर आहेत. हे प्रमाण 1000 लोकामागे 1 टॉवर करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे केवळ मोबाइल आणि इंटरनेट सेवा कार्यक्षम होणार नाहीत तर खेड्यापाड्यांमध्ये आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांच्या विकासाला मदत होणार आहे. इंटरनेटचा वेग चार टप्प्यात 50 एमबीपीएसपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. यासाठी कोणी किती गुंतवणूक करावी याची रुपरेषषा तयार करण्यात आली असल्याचे दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यानी सांगितले. राज्यांनाही या कामी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
..तरच ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावेल
भारतातील मोबाइल सेवा जागतिक दर्जाच्या आहेत. त्या किफायतशीरही आहेत. मात्र, या सेवा जास्त प्रमाणात शहरात उपलब्ध आहेत. त्या ग्रमीण भागतही उपलब्ध होण्याची गरज आहे. तसे झाले तर ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावेल असा यामागे हेतू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.