भारतासह संपूर्ण जगाला ग्रासून टाकणाऱ्या करोना महामारीचे भीषण स्वरूप दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालल्याने या कोंडीतून मार्ग कसा काढायचा, याबाबत जगात सर्व स्तरावर चर्चा चालल्या असल्या तरी ही कोंडी फोडणे प्रत्येकाच्याच हातात आहे, हे विसरून चालणार नाही. देशात सर्वात जास्त फटका ज्या महाराष्ट्राला बसला आहे त्या महाराष्ट्रात येत्या एक-दोन दिवसांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जारी होण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारची परिस्थिती राजधानी दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये पण येण्याची शक्यता दिसत आहे. एकीकडे अर्थचक्र थांबता कामा नये आणि दुसरीकडे या महामारीवर नियंत्रण ठेवायला हवे अशा द्विधा स्थितीमध्ये सध्या सर्वच सरकारे सापडली आहेत.
पण गेल्या वर्षीच्या काही कालावधीमध्ये जेव्हा सर्व स्तरावर लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले त्यानंतर लोकांनी जे निष्काळजीपणाचे दर्शन घडवले त्यामुळेच करोना महामारीची तीव्रता वाढली, हे दुर्लक्षित करून चालणार नाही. करोना महामारीचे संकट वाढविण्यास जेवढा सामान्य नागरिक जबाबदार आहे तेवढीच जबाबदारी त्याला आता या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी घ्यावी लागणार आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमधील परिस्थिती पाहिली तर संपूर्ण व्यवहार बंद झाले होते. देशात आणि राज्यात सर्वत्र शुकशुकाट होता.
लॉकडाऊन एक, लॉकडाऊन दोन, लॉकडाऊन तीन असे विविध टप्पे पार पडल्यानंतर अनलॉकचे काही टप्पे सुरू झाले. 2020 च्या अखेरीस करोना महामारीवर नियंत्रण मिळाले असे वाटत असतानाच लोकांचा निष्काळजीपणा समोर आला आणि गेल्या वर्षापेक्षाही भीषण असे संकट उभे राहिले आहे. करोना खरेतर संपूर्णपणे संसर्गजन्य रोग आहे हे माहीत असूनही सर्वसामान्य नागरिक जर बिनधास्तपणे गावात, शहरात आणि बाजारपेठेमध्ये फिरत असतील तर अवघड परिस्थिती निर्माण होणारच. अशा परिस्थितीमध्ये सरकारने जर पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार केला, तर त्यात सरकारला दोष देता येत नाही. विषाणूची साखळी तोडायची असेल तर संपूर्ण व्यवहार काही काळपर्यंत तरी बंद ठेवावे लागणार आहेत.
हे संकट सामान्य नागरिकांनी आपण होऊनच अंगावर ओढवून घेतले आहे हेही नाकारून चालणार नाही. सरकारने मध्यंतरी जेव्हा सर्व नियम शिथिल केले तेव्हा जणू काही झालेच नाही अशा प्रकारे राजधानी मुंबईतील लोकल भरून वाहून चालल्या होत्या. मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. बाजारपेठा भरल्या होत्या. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग बेपत्ताच झाले होते. करोना महामारीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवले अशा भ्रमामध्ये समाजातील सर्वच घटक वावरत असल्याने 2021 मध्ये पूर्वीपेक्षाही भीषण स्वरूपात ही महामारी समोर आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाप्रमाणे हे वर्षसुद्धा जर वाया जावे असे वाटत नसेल तर ही कोंडी फोडण्याचे काम सामान्य नागरिकांना करावे लागणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेवर जरी टीका करण्यात आली असली तरी प्रत्येक घटकाने आपापली जबाबदारी ओळखून करोनाला आपल्या आसपास फिरकू न देण्याची काळजी घेतली तर या महामारीची साखळी तुटू शकते; पण विनाकारण लॉकडाऊनच्या भयामुळे या प्रक्रियेला विरोध केला जात आहे. सरकारी पातळीवर सरकार फक्त निर्णय घेऊन लॉकडाऊन जाहीर करणे किंवा मागे घेणे असंच काही करू शकते; पण प्रत्येक नागरिक आपापल्या पातळीवर जर सतर्क राहिला तर ही साखळी तोडणे शक्य आहे.
भारतासारख्या 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये सर्वांचे लसीकरण करणे किंवा या लोकसंख्येचा जो भाग करोनाने ग्रस्त आहे त्या लोकसंख्येला रेमडेसिवीरसारखी इंजेक्शन, औषधे पुरविणे किंवा हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करणे ही खरोखरच जिकिरीची गोष्ट आहे, हे नाकारून चालणार नाही. सामान्य लोकांच्या निष्काळजीपणामुळे आणि दुर्लक्षामुळेच सध्या आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे. देशातील सर्व नागरिकांना लसीकरणाचे दोन डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर आणखी काही महिने त्यामध्ये जाणार आहेत, तोपर्यंत ह्या महामारीचा आणखी तिव्रपणे प्रसार होणार नाही याची काळजी सर्वच पातळीवर घ्यावी लागणार आहे. करोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या साध्या त्रिसूत्रीचा वापर करण्यास जर सामान्य नागरिक तयार नसतील तर आणखीन काही वर्षे ही महामारी आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही.
कधी संपायचा हा करोना, असा केवळ विचार करून काहीच साध्य होणार नाही. तर या विषाणूला संपवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पातळीवर सहकार्य आणि योगदान देण्याची गरज आहे. या भीषण महामारीची ही कोंडी फोडणे फक्त सामान्य नागरिकांच्या हातात आहे, हे पुन्हा एकदा सांगावे लागेल. एकदा ही साखळी तुटली की करोनावर नियंत्रण मिळणे सहज शक्य होणार आहे. हे लक्षात घेऊनच ही साखळी तोडण्याचे काम आता गांभीर्याने करावे लागणार आहे. त्यासाठी जर कडक निर्बंध किंवा लॉकडाऊन यासारखे उपाय लागू करण्यात येणार असतील तर त्यालाही सहकार्य करावे लागणार आहे.
गेल्या वर्षी भारतामध्ये कडक स्वरूपात लॉकडाऊन असल्यानेच करोना रुग्णांची संख्या मर्यादित स्वरूपात राहिली होती, हा अनुभव पाठीशी असल्यानेच त्याचा आता विचार करावा लागणार आहे. सरकार आणि आरोग्य यंत्रणा जर आपापल्या पातळीवर काही गोष्टी करत असेल तर नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी सरकारला सहकार्य करायला हवे. ज्या देशात गावात किंवा शहरांमध्ये तेथील नागरिकांनी अशा प्रकारे शंभर टक्के नियमांचे पालन केले आहे तेथे करोना आसपासही फिरकला नाही अशी अनेक उदाहरणे देता येतात. ही उदाहरणे समोर ठेवूनच आता देशातील सर्वच नागरिकांना आपली जबाबदारी ओळखून आगामी वाटचाल करावी लागणार आहे.