Supriya Sule | Sharad Pawar | Ajit Pawar – राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात अत्यंत विचित्र आणि नवी समीकरणे पाहायला मिळत आहेत. कुठे युती आहे तर कुठे मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाने आत्मचिंतन करण्याची गरज : अजित पवार यांच्यावर भाजपाकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सध्या राज्यात जे काही सुरू आहे, ते यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. भाजपा एकीकडे अजित पवारांवर सडकून टीका करते आणि दुसरीकडे त्यांच्यासोबत सत्तेत कामही करते. भाजपा जे आरोप करते त्यात नेमके तथ्य किती असते, याचा त्यांनीच विचार केला पाहिजे. भाजपाने आता खऱ्या अर्थाने आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.” पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ‘दादा-ताई’ एकत्र? राज्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजपाच्या सोबतीने निवडणूक लढवत असली, तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वेगळे चित्र आहे. या दोन्ही महापालिकांमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट (शरद पवार आणि अजित पवार गट) एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी गट भविष्यात एकत्र येतील, या अजित पवारांच्या विधानावर बोलताना त्या म्हणाल्या की, “मी त्यांचे नेमके विधान ऐकलेले नाही, त्यामुळे त्यावर आताच प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.” “आमच्या कुटुंबामध्ये कधीही अंतर पडले नव्हते. आमचे कौटुंबिक संबंध आजही जसे होते तसेच आहेत. राजकीय मतभेद कालही होते आणि आजही आहेत. हे मतभेद भविष्यात कसे राहतील, यावर वेगळी चर्चा होऊ शकते.” असं देखील त्यांनी सांगितलं. १६ जानेवारीला चित्र स्पष्ट होणार : राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढत असल्याने मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. या खिचडी राजकारणाचा फायदा नक्की कोणाला होणार आणि फटका कोणाला बसणार, हे १६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.