शर्मिला जगताप
“इकेबाना’ हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक दत्ता नायक यांनी लिहिले आहे. इकेबाना हे पुस्तक त्या त्या देशांच्या माहितीने ठासून वर्णनात्मक शैलीत लिहिले असते तर ते त्या त्या देशांच्या पर्यटन खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीपुस्तकांपेक्षा केवळ कांकणभर सरस झाले असते. पण या पुस्तकात अंतर्भूत असलेली प्रवासवर्णने प्रभाववादी शैलीने लिहिलेली आहे. लेखकाने स्वतः हे देश पाहिले आहेत. त्यात तटस्थता नाही. त्रयस्थताही नाही. हे देश पाहताना या देशांच्या नैसर्गिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक रसायनात लेखक आकंठ बुडून गेलेले दिसतात. त्यामुळे वाचकाला लेखकाचे, लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे व विचारांचे अस्तित्व जाणवते.
ज्या देशात लेखक गेले त्या देशाचा होण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आत्मजाणिवेच्या ज्या परिप्रेक्ष्यातून तो देश आपल्याकडे पाहतो. हे प्रवासवर्णन वाचून देशविदेशांत प्रवास करण्याची इच्छा वाचकांच्या मनात उत्पन्न होईल.
बौद्ध धर्माचा ज्या ज्या देशात प्रचार आणि प्रसार झाला आहे, असे देश डोळ्यासमोर ठेवून लेखकाने प्रवास केला आहे. यात प्रामुख्याने भूतान, जपान, श्रीलंका वगैरे देशांचा समावेश आहे. या देशांची माहिती वाचताना आपसूकच बौद्ध धर्माचा प्रभाव आपल्या मनावर बिंबवण्यास लेखकास यश आले आहे. भूतानचे वर्णन करताना लेखक म्हणतो, “भूतानी लोकांच्या जीवनात बौद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब ठायी-ठायी दिसते.’
प्रवासाने आपल्या दैनंदिन जीवनामुळे मनावर किंबहुना मेंदूवर साठलेली धूळ पुसली जाते. आपण ताजेतवाने होतो. आपली क्षितिजे विस्तारतात.
बा. सी. मर्ढेकरांच्या शब्दांत-
“भंगू दे काठिण्य माझे
आम्ल जाऊ दे मनीचे;
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे’
हा उद्देश सफल होतो.
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
“येणे मार्गे जया ठाया जाईजे
जो गावो आपणाचि होइजे’
पुस्तकाचे कव्हर पेज खूपच बोलके आहे. कारण त्यावर विविध देशांचे मेमेंटोज् आहेत. मात्र, सर्वात शेवटचा फोटो रिकामा आहे. तो फोटो का रिकामा ठेवला आहे, याचे उत्तर वाचकांना पुस्तकाच्या शेवटच्या पानावरील शेवटच्या ओळीत मिळते. लेखक सांगतो, तो आता पुढच्या ज्या देशाला भेट देणार आहे त्या देशाच्या मेमेंटोजसाठी ही जागा रिकामी ठेवली आहे. अशा पद्धतीने कव्हर पेजपासून पुस्तकाच्या शेवटच्या ओळीपर्यंत सर्व देश फिरून आल्याचा भास वाचकांना होतो. हे पुस्तक साधना प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.