Inspirational biography of Bhimabai Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर इतिहासपुरुषाला जन्म देणारी माता किती महान असेल, याबद्दल सामान्य वाचकाला जिज्ञासा असते. दिनकर विष्णू काकडे यांनी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री…भीमाबाई आंबेडकर’ ( Mother of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar…Bhimabai Ambedkar’) हे छोटेखानी चरित्र लिहून ती पूर्ण केली आहे, बाबासाहेब यांच्या जडणघडणीत वडील रामजी व आई भीमाबाई यांनी घेतलेले कष्ट, परिश्रम, व संस्कार यांचा मोलाचा वाटा आहे. एकूण दहा प्रकरणात नेमक्या आणि योग्य शब्दात हे चरित्र एकाच बैठकीत वाचता येण्यासारखे आहे.भाषा सुलभ व ओघवती आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावात सुभेदार मेजर लक्ष्मणराव मुरबाडकर या श्रीमंत पित्याच्या पोटी भीमाबाईचा जन्म झाला. वडील लक्ष्मणराव हे आधी मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार होते. लहानपणी भीमाबाईचा हूडपणा व हट्टीपणा पाहून त्यांचे आईवडिल उपदेश करीत…” बाळा , बाईच्या जातीला इतका हूडपणा चांगला नव्हं,… स्त्री हे परक्याचं धन म्हणतात….माहेरी जसं आई बाप लाड करतात तसं सासरी होत नाही..सासू सासरे यांचं मन धरावं लागतं..त्यांची सेवाशुश्रुषा करावी लागते..पती हा सर्वस्व असतो.. त्याच्यावर प्रेम करून संसाराचा गाडा हाकावा लागतो.” अशा उच्च संस्कारांचे बालकडु त्यांना मिळाले.त्यांच्या लहानपणीचे वर्णन पहिल्या प्रकरणात लेखकाने यथायोग्य केले आहे.
इ.स. १८६७ मध्ये वयाच्या १३व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह रामजी सकपाळ यांच्याशी विवाह झाला. इ.स. १८६६ च्या सुमारास रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत नाईक पदावर होते. “रामजी राजबिंडा, बुध्दिमान , धैर्य, शौर्य यांचा संगम असलेला, तारुण्यानं मुसमुसलेला तरुण होता, त्यांच्यात ज्ञान , विनय, आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम होता..”असे लेखकाने केलेले वर्णन चपखल आहे.
रामजी व भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा, व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव, व भीमराव ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता. रामजी ज्या पलटणीत होते. ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती.
येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव ‘भिमा’ असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली.
आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य (दलित) गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबवडे या गावचे होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील ‘कॅम्प दापोली’ वस्तीत परिवारासह रहाण्यासाठी आले.
दापोली कॅम्पात अधिकारांवरून, पंथावरून, राहणीमानावरून, पैशावरून वादविवाद होत असत. लष्करातील प्रस्थापितांच्याकडून उच्चनिच्चपणामुळे मनाला चटके सहन करावे लागले. मुलांच्या खेळण्यावरून, तळावरील पाण्यावरून,त्यांची मुले व बायका भीमाबाईबरोबर सतत भांडू लागले, त्यामुळे इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे येऊन ते राहिले.
या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. शेवटच्या ९ व्या तसेच १० व्या प्रकरणात कबिराचे धार्मिक कर्मकांड, पाखंडीपणा, वर्णव्यवस्था, मूर्तीपूजा, तिर्थक्षेत्रातील फोलपणा, जातीभेद, उच्चनिच्च भेदभाव या विरोधातील प्रबोधन करणारे दोहे व त्यांचा अर्थ लेखकाने सविस्तरपणे दिले आहेत, त्यामुळे हे पुस्तक केवळ भीमाबाई आंबेडकर’ यांच्या चरित्रापुरते मर्यादित न राहता त्याला अध्यात्मिक व वैचारिक उंची प्राप्त झाली आहे.
इ.स. १८९६ मध्ये रामजी कबीरपंथी झाले, त्यांनी संत कबीर आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या विचार आणि तत्वज्ञान यांचे बाळकडू बाबासाहेबांना पाजले होते. भीमाबाईच्या मनात सुद्धा कबीरांविषयी अपार श्रद्धा होती.साताऱ्यात आल्यावर बाबासाहेबांना ‘ कॅंप,स्कूल’ मध्ये घातले,”मुलाचे पाय पाळण्यात दिसतात”असं त्यांच्या बाबतीत रामजी, भीमाबाई सह शिक्षकांना ही वाटू लागले.
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षीच शाळेत कुशाग्र बुद्धीचे व हजरजबाबी, हुशार म्हणून बाबासाहेबांचे कौतुक होत होते, आणि अशा सुखासमाधानाचा व श्रमसाफल्याचा काळ आला असतांनाच मस्तकशूळ या आजाराने भीमाबाईंचे निधन झाले, सुभेदार रामजीच्या कुटुंबांवर जणू आभाळ कोसळले.
भारतरत्न डॉ.भीमराव तथा बाबासाहेब रामजी आंबेडकरांसारख्या थोर विश्ववंद्य युगपुरुषाला जन्म देणाऱ्या धन्य त्या युगस्त्रीचे हे चरित्र निश्चितच वाचकांना उदबोधक व एका कर्तबगार, निर्मळ आईला न्याय देणारे ठरणार आहे.समस्त आंबेडकर चळवळीतील अभ्यासक, संशोधक, अनुयायी, तसेच फुले, शाहू, आंबेडकर, यांच्या विचारपथावरून चालणाऱ्या पुरोगामी कार्यकर्त्यांना हे चरित्र प्रेरणादायी आहे. ‘स्वरूप प्रकाशन’चे सुरेश शिंदे यांनी हे स्फुर्तीदायी चरित्र मोठ्या नेटाने, आकर्षक, दर्जेदार केले आहे, त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.
-डॉ. सुनीलकुमार सरनाईक.
कोल्हापूर.
-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर’.
लेखक: दिनकर विष्णू काकडे,
मो.९०४९३ २१३०५
मुखपृष्ठ: सतीश बारस्कर
मो .९८९०४ २४२४१
प्रकाशक:एस.के.शिंदे.
स्वरूप प्रकाशन, महाराष्ट्र मेट्रो स्क्वेअर,गाळा नं. १५२, जोगेश्वरी मंदिराजवळ, अप्पा बळवंत चौक,
पुणे-४११००२
मो.९९२१० ७७६५७
पृष्ठे:११२,.
किंमत:₹२००/-