माधुरी तळवलकर
ग्रंथालीने प्रकाशित केलेला, किरण येले यांचा “बाईच्या कविता’ हा काव्यसंग्रह आवर्जून वाचावा, समजून घ्यावा असा! त्यांची एखादी लहानशीच कविता खूप अर्थ सांगून जाते.
बाई
दिवेलागणीला
देवापुढे
दिवा उजळते
हात जोडते
आणि पुटपुटत
ओठातला अंधार
पोटात घेते
बारा-पंधरा शब्दांची ही कविता! पण त्यातून तिची आयुष्यभराची घुसमट व्यक्त होते. एक म्हणजे दिवसाच्या संध्याकाळी, कातरवेळी ती दिवा लावून देवालाच शरण जाते. बाकी तिचे कोण ऐकणार? देवापुढेसुद्धा ती मोठ्यांदा नाही बोलत! पुटपुटते. बाईने हळू आवाजातच बोलावे अशी तिला शिकवण आहे. त्यामुळे हात जोडून ती तोंडातल्या तोंडात देवापाशी काय ते सांगते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ओठातला अंधार पोटात घेते. ओठांपाशी आलेले दुःख मोठ्या संयमानं गिळून टाकते, पोटात घालते.
या पुस्तकातील कवितांमधून बाईच्या आयुष्यातले कितीतरी सल, अडचणी, अनुभव कवी शब्दांकित करतो. आश्चर्य वाटते की, हे तर आपण अनुभवलेले आहे. पण हे आपल्या जीवनातून वेचून असे बाजूला काढावे आणि आपले आयुष्य समजावून घ्यावे असे कधी वाटलेच नाही. आपण नेहमी, स्त्रीनं असंच जगायचं असतं, असं गृहीत धरलं का? व्यक्ती म्हणून त्रयस्थ दृष्टिकोनातून बाईनं कधी स्वतःचा विचारच केला नाही का?
या कवितांमध्ये काही दीर्घ कविता आहेत; काही अगदी लहान! पण आशय खूप व्यक्त होत राहतो… प्रत्येकच कवितेतून! अनेक प्रसंगातून कवी त्या त्या घटनेतला गर्भित अर्थ, खराखुरा अर्थ चिमटीत पकडून आपल्यापुढे ठेवतो. मग तो लगोरीचा खेळ असो, बाईचं नोकरी करणं असो… ती शॉपिंग करते, रांगोळ्या काढते… का करते ती हे सारं? त्यातून तिला काय व्यक्त करायचं असतं?
लिफ्टमधे शिरते बाई, लोकलमध्ये, कुठेही… तेव्हा ती आपोआप अत्यंत सावध होते. तिच्या नकळत ती सगळीकडे टवकारून पाहू लागते. इथे हजर असलेल्या पुरुषापासून आपल्याला कितपत धोका आहे हे कळण्यासाठी तिच्या अंगांगाला जणू डोळे फुटतात. तिथून जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा ती काय करते?
बाई
तिच्या अंगांगाला फुटलेला आपला
एकेक सावध डोळा
घडी घालून बंद करते
बाईनं कळत-नकळत अनुभवलेले कित्येक क्षण जर समजावून घ्यायचे असतील तर एका संवेदनशील पुरुषानं लिहिलेल्या “बाईच्या कविता’ वाचायला हव्यात. त्या वाचून स्त्रियांना आत्मप्रत्ययाचा अनुभव येईल आणि पुरुषांनाही ईमरोज या कवीनं विचारलेल्या “आदमी औरत के साथ सोता है, जागता क्यों नहीं?’ या प्रश्नाचं उत्तर शोधायला उद्युक्त करेल.