मुंबई : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे चार दिवस शिल्लक असताना राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. उत्तरेकडील शीतलहरी हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने राज्यातील हवामानात लक्षणीय बदल जाणवत आहेत. राज्यभरातच थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषत: पहाटे आणि रात्रीच्या सुमारास गारठा अधिक जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, डिसेंबरअखेर वा-यांच्या दिशेत बदल होण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम तापमानावर होऊ शकतो. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील काही भागांत पहाटे धुक्याची चादर पसरलेली दिसून येईल. मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.