Board Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन बोर्ड परीक्षा (Board Exam) पद्धती लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे. २०२६ शैक्षणिक वर्षापासून दहावीकरिता दोन बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार असल्या, तरी पहिल्या सत्रातील परीक्षेला बसणे सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल, असे मंडळाने स्पष्ट केले. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याने पहिल्या बोर्ड परीक्षेत (Board Exam) किमान तीन विषयांची परीक्षा देणे आवश्यक आहे. विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि भाषा या विषयांपैकी कोणत्याही तीन विषयांच्या परिक्षांना बसणे बंधनकारक राहील. जर एखादा विद्यार्थी पहिल्या सत्रात तीनपेक्षा कमी विषयांची परीक्षा देतो किंवा अनुपस्थित राहतो, तर त्याला दुसऱ्या बोर्ड परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा विद्यार्थ्यांना अत्यावश्यक पुनरावृत्ती श्रेणीत वर्गीकृत करण्यात येईल आणि त्यांना पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या मुख्य परीक्षांमध्येच सहभागी होता येईल.काही विद्यार्थ्यांनी वैयक्तिक किंवा आरोग्याच्या कारणास्तव पहिल्या सत्रात अनुपस्थित राहण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली असता, त्यानंतर मंडळाकडूनही नियम अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत. Board Exam बोर्डाच्या मते, दोन परीक्षा पद्धतीचा उद्देश विद्यार्थ्यांवरील ताण कमी करणे आणि त्यांना कामगिरी सुधारण्याची संधी देणे हा आहे. पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण व पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रात तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची संधी उपलब्ध असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणात अधिक चांगली कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे. या नव्या धोरणामुळे परीक्षा पद्धतीत मोठा बदल होणार असून, शाळा आणि पालकांनीही त्यानुसार तयारी सुरू केली आहे. सीबीएसईने मात्र स्पष्ट केले आहे की नियमांचे पालन सर्वांसाठी समान असेल आणि पहिल्या परीक्षेतील उपस्थिती अनिवार्य राहील.