BMC Mayor Election : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत भाजप-एकनाथ शिंदे गट युतीने स्पष्ट बहुमत (११८ जागा) मिळवले असले तरी महापौरपदाच्या निवडीसाठी राजकीय खेळ सुरू आहे. भाजपने ८९ जागा जिंकल्या, तर शिंदे गटाच्या शिवसेनेने २९ जागा मिळवल्या. ठाकरे गट (शिवसेना UBT) ला ६५ जागा मिळाल्या. हे निकाल ठाकरे कुटुंबीयांच्या तब्बल तीन दशकांच्या मुंबईवरील प्रभुत्वाचा अंत दर्शवतात. शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, “आपला महापौर व्हायला पाहिजे हे स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल.” या सूचक वक्तव्याने सस्पेन्स वाढवला आहे. त्यांच्या या विधानानंतर संजय राऊत यांनी पुढाकार घेतला असून, दोन तुटलेली मने सांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबईत भाजपचा महापौर होऊ नये ही सर्वांची इच्छा आहे. शिंदे गटाचे निवडून आलेले उमेदवार मूळचे शिवसैनिक आणि मराठी असल्याचे अधोरेखित करत त्यांनी सूचकपणे म्हटले की, त्यांच्या मनातही मशाल धगधगत आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या २९ नगरसेवकांपैकी २५ मराठी असल्याची बाब राऊत यांनी अधोरेखित केली. यामुळे शिंदे गटातीलच हे २५ नगरसेवक भाजपचा महापौर होऊ द्यायला तयार नसल्याचे आणि त्यांच्याशी पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. राऊत यांनी पुढे म्हटले की, एकनाथ शिंदे यांनाही भाजपचा महापौर व्हावा असे वाटत नाही. त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये (ताज हॉटेल) कोंडून ठेवले आहे, पण हे टेन्शन वाढवत आहे. ज्यांनी शिवसेना फोडली, त्यांनाच आता भीती वाटते. महायुतीचा महापौर बसणार असता तर नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज नव्हती, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत असल्याचे सांगत राऊत यांनी म्हटले की, बहुमत कितीही असले तरी ते चंचल असते.मुंबईच्या राजकारणात ‘खेला होबे’ होईल असे संकेत देत त्यांनी सस्पेन्स वाढवला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे येथेही स्पष्ट बहुमत नसल्यासारखी परिस्थिती आहे, जिथे शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरला होता. आता शिंदे गटाने महापौरपदासाठी वाटाघाटीची शक्ती वाढवली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर असावा, अशी शिंदे गटाची जाहीर इच्छा आहे. यामुळे महायुतीत अंतर्गत कलहाची सुरुवात होऊ शकते. ठाकरे गटाकडून शिंदे-भाजप संबंध अधिक ताणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या शिंदे गटाच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले असले तरी राऊत यांच्या मते, संदेश कसाही पोहोचवता येतो. मुंबईच्या राजकारणात ‘नवीन ‘खेळ’ पाहायला मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौरपदावर अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे, पण सध्या तणाव आणि सस्पेन्स कायम आहे.