राज्यातील महानगरपालिका (BMC Election) निवडणुकांचा बिगूल वाजला असून, राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेक पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) सलग धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता मुंबईतून मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युती जाहीर झाली आहे. गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ही युती अधिकृतपणे घोषित केली होती. मात्र, युतीच्या घोषणेनंतर अवघ्या काही दिवसांतच मनसेच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. स्नेहल जाधव यांच्या राजीनाम्याचे कारण वॉर्ड क्रमांक १९२ मधून उमेदवारी जाहीर करताना त्यांना विश्वासात न घेणे हे आहे. या निर्णयामुळे त्या अत्यंत नाराज झाल्या होत्या. स्नेहल जाधव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत १९९२-१९९७, १९९७-२००२ आणि २००२-२००७ अशा सलग तीन टर्ममध्ये या वॉर्डमधून नगरसेविका म्हणून यशस्वी प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर २००७-२०१२ या कालावधीत त्यांच्या पतीनेही याच वॉर्डमधून नगरसेवक म्हणून विजय मिळवला होता. अशा प्रकारे जाधव कुटुंबाने सलग चार टर्ममध्ये या वॉर्डचे प्रतिनिधित्व केले असतानाही, यंदा मनसेकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने स्नेहल जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. हा राजीनामा मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेषतः ठाकरे गटाशी युती जाहीर झाल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्याचा असा राजीनामा पक्षाच्या अंतर्गत एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. दरम्यान, राज्यातील अनेक महापालिकांमध्ये युती आणि आघाड्यांचे राजकारण जोरात सुरू आहे. यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची तिकिटे कापली गेली आहेत. ज्यांना उमेदवारी नाकारली गेली, ते सर्वच पक्षांमध्ये नाराज आहेत. अशी नाराजीची नाट्ये पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे.