सातारा,(प्रतिनिधी) – लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या आंधळी (ता. माण) येथील धरणात आलेल्या पाण्याचे पूजन बुधवारी (दि. 21) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तेथे जाहीर सभा होणार आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. पाणीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी धरणात 150 फुटांचा रॅम्प आणि त्यावर आकर्षक मंडप उभारण्यात आला आहे. भव्य व्यासपीठ तयार करण्यात येत असल्याने तालुक्यात कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आमदार जयकुमार गोरे यांनी गेली 14 वर्षे अथक प्रयत्न करून, जिहे-कठापूर योजनेची रखडलेली कामे मार्गी लावली आहेत. अनेक अडचणींवर मात करून, या योजनेचे पाणी प्रथम एका नलिकेतून प्रथम खटाव तालुक्यातील नेर धरणात आणि आता साडेबारा किमी लांबीच्या आंधळी बोगद्यातून माण तालुक्यात आणले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माण तालुक्यात जिहे-कठापूर योजनेचे पाणी येत आहे. या पाण्यामुळे आंधळी धरण भरून, पुढे माणगंगा नदी वाहती करण्यात येणार आहे. नदीवरील 17 बंधारे भरण्यात येणार आहेत. माणच्या उत्तर भागातील 32 गावांना आंधळी धरणातून पाणी देण्यासाठी आ. गोरे यांनी प्रस्तावित केलेल्या विस्तारीत योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत.
गेली कित्येक वर्षे चातकासारखी पाण्याची वाट पहाणार्या माणच्या जनतेसाठी जिहे-कठापूरचे पाणी येणे, म्हणजे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. आ. गोरे यांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करत, हे पाणी माण तालुक्यात आणले आहे. दुष्काळाच्या झळांनी होरपळणारे जनजीवन या पाण्यामुळे सावरणार आहे. शेतीला पाणी मिळाल्याने या भागातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील बेरोजगारी संपणार आहे. त्यांचा आर्थिक स्तर उंचावणार आहे.
जिहे-कठापूर योजनेसाठी हजारो कोटींचा निधी आणणार्या आ. गोरे यांनी या योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या 31 गावांच्या सर्वेक्षणासाठी 96 लाखांचा निधी मिळवला आहे. आरक्षित केलेले सव्वा टीएमसी पाणी या भागाला मिळणार असल्याने जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जलपूजनासाठी येणार्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत घरोघरी गुढ्या उभारून, सडा-रांगोळ्या काढून आणि ढोल-ताशांच्या गजरात करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी फडणवीस यांच्या सभेला दहिवडीत रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. आता या सभेसाठीही उच्चाकी गर्दी होण्याचे संकेत माण आणि खटाव तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या तयारीवरून मिळत आहेत.
सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन व्यवस्था
आंधळी धरणात आलेले पाणी पाहायला दररोज गर्दी होत आहे. धरणात उभारण्यात आलेल्या 150 फुटांच्या रॅम्पवरून जाऊन, देवेंद्र फडणवीस हे जलपूजन करणार आहेत. सभेसाठी होणारी गर्दी ध्यानात घेऊन सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली असून, पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.