लोकसभेसाठी “मिशन 45′ लक्ष्यवेधी : राज्यस्तरीय नेत्यांकडून पोषक वातावरण निर्मिती
दिगंबर पडकर
जळोची – गेल्या 50 वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण शरद पवार व त्यांच्या कुटुंबीयांभोवती फिरत आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सुरुवात बारामतीमधून होते. राज्यात सत्तापालट असो की केंद्राने राज्यात महत्वाचा असणारा राजकारणाचा गड बारामती. बारामतीत लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात भाजपचे मिशन बारामती लक्षवेधी ठरणार का, याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ ताब्यात घ्यायचाच, अशी रणनीतीच भाजपकडून आखली जात आहे. केंद्रातील अनेक दिग्गज नेते, मंत्री हे बारामतीत भेटी देणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
याची तयारी म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामतीचा दौरा करणार आहेत. त्यामुळे एकीकडे बारामतीचा होत असलेला विकास आणि दुसरीकडे भाजपने आखलेली रणनीती कितपत यशस्वी होणार याची चर्चा राजकीय वर्तृळात रंगली आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणजे बारामती, हे समीकरण 24 वर्षांपासून आहे. त्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे दिग्गज नेते मतदारसंघाचे नेतृत्व करतात. मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सांगतील तोच उमेदवार, असे समीकरणच रुढ झाले आहे. भाजपकडून बारामतीच्या राजकारणाची पार्श्वभूमीवर समजावून घेण्यासाठी अनेक दिग्गज नेते बारामतीत दाखल होत आहेत.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना थेट लढत देत निवडणूक अटीतटीची केली होती. फार थोड्या फरकाने महादेव जानकर यांचा पराभव झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीला अडचणींचा सामना करावा लागला होता.
राजकीय समीकरणासाठी गोळाबेरीज
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने कोणतीही रिस्क नको म्हणून लोकसभेची अगोदरच आखणी सुरू केली आहे. आता राज्याचे राजकारण पुन्हा एकदा बारामतीभोवती फिरत असून नेत्यांची बारामतीत मांदियाळी पहायला मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल, खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर, भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, इंदापुरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक स्थानिक नेते तळ ठोकून होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मिशन बारामती लक्षवेधी ठरणार आहे.