सातारा – सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता हा देशाचा आत्मा आहे. पण, ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून हा आत्माच नष्ट करण्याची भूमिका भाजपची आहे. त्यानुसार भाजपला कर्नाटक निवडणुकीत जनतेने नाकारले तर मिशन कमळच्या माध्यमातून लोकशाही उध्वस्त करुन सत्ता मिळविण्याचे सूत्र त्यांनी ठेवले आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले.
खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिली तरी त्याचा राष्ट्रवादीला काहीही फरक पडणार नसल्याचेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी श्री. पवार साताऱ्यात आले होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजीनामा परत घेतल्यानंतर होम ग्राऊंडवर आल्यावर आपल्याला कसे वाटते, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “”थांबावे, अशीच इच्छा होती. पण साथीदारांनी थांबून दिले नाही. माझ्या आयुष्यात सगळ्या साथीदारांचे सहकार्य, पाठिंबा महत्वाचा होता. त्यांची समजूत काढू असे ठरवले होते. पण, त्यांच्या आग्रहातून आलेल्या मागणीमुळे निर्णय बदलला.
आता पक्ष अधिक जोमाने काम करणार आहे. भाजपने मिशन कमळच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या पक्षातील सहकाऱ्यांना फोडून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. तसेच कर्नाटकातील जनतेने भाजपला नाकारले तर मिशन कमळच्या माध्यमातून संसदीय लोकशाही उद्धवस्त करुन सत्ता मिळविण्याचे सूत्र त्यांनी ठेवले आहे.” भाजपने उदयनराजेंवर मोठी जबाबदारी दिली तरी राष्ट्रवादीला काहीही फरक पडणार नसल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले, “”श्रीनिवास पाटील यांच्या निवडणुकीत कोणाला फटका बसला समजले आहेच ना?”पक्षात वारसदार निर्माण करण्यात पवार यांना अपयश आले अशी टीका “सामना’तून करण्यात आली होती.
याबाबत श्री. पवार म्हणाले, “”आम्ही आमच्या पक्षात घेणाऱ्या निर्णयाची आम्ही बाहेर जाऊन प्रसिद्धी करत नाही. राज्यात 1999 मध्ये कॉंग्रेस व आमचे संयुक्त मंत्रिमंडळ करायचे होते. त्यावेळी नवीन मंडळींना सामावून घेण्याचे ठरवले. जयंत पाटील, अजित पवार, वळसे पाटील, देशमुख, आर. आर. पाटील अशी अनेक नावे आहेत. त्यांच्या आयुष्यातील सत्तेचा तो पहिला काळ होता. त्यांची आम्ही नियुक्ती केली. मी राज्यमंत्री म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर मला प्रमोशन मिळाले होते. पण, ही जी नावे घेतली त्या मंडळींना थेट कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली. त्या प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तृत्व दाखवले.
त्यामुळे आम्ही जे काही तयार करतो, ते कर्तृत्व दाखवते. आम्ही काय करतो, हे आम्हाला ठाऊक असते. त्यामुळे त्यांनी लिहिले तरी काहीही फरक पडत नाही.” कर्नाटकात या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला प्रवेश करायचा आहे. त्यासाठी आम्ही उमेदवार देताना महिला, अल्पसंख्यांक, मुस्लिम, दलित अशा सगळ्यांना संधी दिली. कर्नाटकात आम्ही पाऊल टाकलायचा सुरवात केली आहे.
आम्ही मित्र पक्षांशी बोललो नाही. कारण आम्हाला शुन्यातून सुरवात करायची होती. विविध पक्षांना सोबत घेऊन जाताना त्या पक्षांना आपण काही तरी देतो असे सांगावे लागते. मर्यादित जागा मिळल्यास त्याचा वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळे याचा कॉंग्रेसवर परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीला हद्दपार करा, या फडणवीसांच्या वक्तव्यावर श्री. पवार म्हणाले, “”काही काम न करता ते फक्त शब्दाचा खेळ करतात.
तसेच वक्तव्य बावनकुळेंनीही केले आहे. रयत शिक्षण संस्थेत मी सभासद नसताना मी अध्यक्ष कसा, असा प्रश्न केला आहे. रयतमध्ये मी 40 वर्षे सभासद आहे. मी मॅनेजिंग कौन्सिलवर आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा होते, त्यावेळीही मी होतो, घटना बदलायचे कारणच नाही.” महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत श्री. पवार म्हणाले, “”कर्नाटक निवडणुकीनंतर मुंबईला गेल्यानंतर उद्धव ठाकरे, नाना पटोले, शेकापचे नेते तसेच इतर अशा सगळ्यांशी चर्चा करुन महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास वाढेल असे काही तरी ठरवले जाईल.” केंद्रीय मंत्री लोकसभा मतदारसंघात येऊन बूथ प्लॅनिंग करत आहेत.
याविषयी श्री. पवार म्हणाले, “”लोकांच्या अपेक्षांची माहिती घेऊन दिल्लीत जाऊन मंत्रिमंडळाला सांगून ते प्रश्न सोडवण्यास हातभार लावले जात असतील तर ते चांगले आहे.’ महाराष्ट्र कोणाला नाही म्हणत नाही, या दोन घास खा..,’ असा सल्ला त्यांनी दिला. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी राहिलेली नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर श्री. पवार म्हणाले, “अजयकुमार मिश्रा नावाचा केंद्रांत कोणी मंत्री आहे, हे मला आजच समजले.’
शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या
अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईवर श्री. पवार म्हणाले, “”मी शेतात जाऊन पाहणी केली. अतिवृष्टीने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. पिके गेली, कांदा, द्राक्षे तसेच भाजीपाल्याचे नुकसान झाले. लोक वाट पाहत आहेत की कोणीतरी पाहणी करतील. स्थानिक अधिकारी कोणी आलेले नाहीत. काही ठिकाणी लोक आले, पाहणी केली. पण 15 दिवस झाले तरी मदत हातात आलेली नाही. लोक अस्वस्थ आहेत. लोकांवर संकट येते त्यावेळी पक्ष वगैरेचा विचार न करता राज्यकर्त्यांनी मदतीचा हातभार द्यावा.”
पृथ्वीराज चव्हाणांची कॅटेगरी कोणती?
कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस ही भाजपची “ब’ टीम असल्याचे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. याबाबत पवार म्हणाले, “”त्यांच्या पक्षात त्यांचे काय स्थान आहे? ए, बी, सी की डी आहे ते एकदा तपासावे. त्यांच्या पक्षातील एका सहकाऱ्याला विचारले तर त्यांची कॅटॅगरी कोणती आहे, ते तुम्हाला समजेल. पण ते खासगीत सांगतील. जाहीर करणार नाहीत.”