मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असा आशायुक्त विश्वास नुकताच भाजपच्या नेत्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला तर दुसरीकडे भाजपने आमचे सरकार पाडूनच दाखवावे, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिल्याने महाराष्ट्रातील राजकारण एकीकडे भाजपाची “आशा’ दुसरीकडे शिवसेनेचा “विश्वास’ यामध्ये अडकलेले दिसते. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे आणि करण्यात आलेल्या विधानांमुळे महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन घटक पक्षांमध्ये मतभेद असल्याच्या शक्यता समोर आल्याने भाजपची आशा पुन्हा बळावली नसेल तरच नवल.
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची चौकशी एनआयएकडे सुपूर्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारनेच करायला हवा, असेही त्यांनी सूचित केले होते. त्याच वेळी असा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे या विषयावरून माध्यमांनी महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या बातम्या फुलवल्याने भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या. या सुमारास कॉंग्रेसचे अधिकृत पत्रक असलेल्या शिदोरी या नियतकालिकामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबतीत आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याने भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेच्या हिंदुत्वप्रेमाला आणि सावरकर प्रेमाला साद घातली. सावरकरांचा अपमान शिवसेना कसे काय सहन करू शकते, असा सवालही भाजपने उपस्थित केला; पण अशा विषयांकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्याचे धोरण उद्धव ठाकरे यांनी स्वतः स्वीकारले आहे असेच दिसते. कारण या विषयांवर त्यांनी स्वतः किंवा त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनीही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
शिवसेनेचा कोणताही नेता अथवा प्रवक्ताही या विषयावर बोलणे टाळत आहे. अगदी थोड्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे दोन-तीन प्रसंग निर्माण झाल्याने शिवसेनेच्या नेतृत्वाखालील हे सरकार फार काळ टिकणार नाही अशी जाहीर घोषणा करण्याची भाजपाला आणखी एक संधी मिळाली. भाजपमधील पक्षांतर्गत नियुक्त्या झाल्यानंतर आता मुंबईमध्ये भाजपाचे राज्य अधिवेशन होत आहे. या अधिवेशनामध्ये पक्षाची पुढील दिशा ठरवण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील मतभेद टोकाला गेले आणि शिवसेनेला पाठिंब्याची गरज भासली तर भाजप शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो का किंवा मध्यावधी निवडणुकीची तयारी करावी का, याबाबत या बैठकीमध्ये विचारमंथन होणार आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार फार काळ टिकणार नाही या त्यांच्या भूमिकेवरच हे सगळं विचार मंथन अवलंबून राहणार आहे; पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये व्यक्त केलेली विधाने पाहता हे सरकार घटक पक्षांमध्ये थोडाफार अंतर्विरोध असला तरी टिकेल असेच संकेत मिळत आहेत. सांगली येथील कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी तीन पक्षांचे सरकार व्यवस्थित काम करत आहे, असे विधान केले होते तर उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना भाजपला आपले सरकार पाडून दाखवावेच असे थेट आव्हान दिले आहे.
सत्ताधारी म्हणून महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष म्हणून भाजप ह्यांची आपापल्या पातळीवरील भूमिका योग्य असली तरी त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण मात्र अस्थिर आहे, असे सामान्यांना वाटत आहे. साहजिकच महाविकास आघाडीने जर समान किमान कार्यक्रम तयार केला असेल तर या कार्यक्रमाच्या बाहेर महाविकास आघाडीचा कोणताही घटक पक्ष काम करणार नाही अशी खात्री त्यांना करावी लागेल. हिंदुत्व आणि सावरकर हे दोन विषय आगामी कालावधीमध्ये आणखीनच पेटणार आहेत. महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नसले तरी कॉंग्रेसचे नेते मात्र अधूनमधून विचित्र विधाने करून महाविकास आघाडीबाबत काही अडचणी निर्माण करत आहेत.
अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून लेखी आश्वासन घेतल्याबाबत केलेले विधान असो किंवा सध्या शिदोरी नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेला सावरकरांवरील आक्षेपार्ह उल्लेख असो कॉंग्रेसने नजिकच्या काळामध्ये महाविकास आघाडीचा आघाडी धर्म पाळण्याबाबत विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चांगला समन्वय असल्याने या दोन पक्षांमधील कोणतेही मतभेद समोर येत नाहीत; पण कॉंग्रेस नेत्यांची विधाने सरकारला अडचणीची ठरू शकतात. भाजपला केवळ सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे तीन राजकीय पक्ष एकत्र आले असतील तर आपल्या विधानांमुळे किंवा आपल्या कृतीमुळे पुन्हा भाजपचा फायदा होणार नाही याची खात्री त्यांनाच करावी लागेल. राज्यात भाजप आणि शिवसेनेचे सरकार पाच वर्षे सत्तेवर असतानाही शिवसेना सतत सरकारविरोधी भूमिका घेत होती; पण अशा प्रकारच्या मतभेदांमुळे या सरकारला कोणताही धोका नव्हता. कारण विरोधक सक्षम नव्हते; पण आज विधानसभेमध्ये भाजपाची सदस्य संख्या 100 पेक्षा जास्त असल्याने ती कोणत्याही क्षणी निर्णायक ठरू शकते याची दखल महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना घ्यावीच लागेल.
भाजपने आपले सरकार पाडून दाखवावे, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असले तरी भाजपाचे असे मनसुबे यशस्वी होणार नाहीत याची काळजी स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांच्या घटक पक्षांतील नेत्यांना घ्यावी लागेल. सध्या तरी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजपने प्रभावीपणे काम केले तर ते महाराष्ट्राला उपयुक्त ठरू शकेल. कारण विद्यमान सरकारमध्ये अंतर्विरोध असले तरी आणि किरकोळ मतभेद मधून मधून दिसत असले तरी हे सरकार अस्थिर आहे, असे म्हणता येत नाही. त्यामुळे भाजपची आशा सध्यातरी मृगजळासारखी दिसत आहे. भाजपच्या राज्य अधिवेशनातील निर्णयानंतरच भाजपची भूमिका आणि आगामी काळातील मार्गक्रमण कशी असेल हे लक्षात येईल.