आमदार गाडगीळ यांची सडकून टीका
पुणे – करोनाने थैमान घातले असताना सरकार आणि जनतेला मदत करण्याऐवजी आंदोलन करणे ही भाजपची भूमिका बेजबाबदारपणाची व हृदयशून्य आहे, अशी टीका कॉंग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आंदोलन, धरणे सध्या बंदी असताना महाराष्ट्रातील भाजप नेते जर आंदोलन करत असतील, तर त्यांवर केंद्र सरकार कारवाई करणार का? असा प्रश्न गाडगीळांनी उपस्थित केला आहे.
करोना संकटासंबंधात केंद्राला सहकार्याची भूमिका कॉंग्रेसने घेतली होती. पण, महाराष्ट्रात भाजपने जर हीच भूमिका कायम ठेवली तर उद्यापासून वैचारिक उत्तर दिले जाईल, अशा इशाराही गाडगीळांनी दिला.
संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणारे कुठे ते हुतात्मे आणि कुठे हे अतृप्त आत्मे? अशी उपरोघक टीकाही गाडगीळांनी केली. तसेच देश संकटात असतांना सरकारच्यामागे उभे राहायचे ही भूमिका त्यावेळी कै. अटलबिहारी बाजपेयींनी घेतली होती, अशी आठवणही त्यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने भाजप नेत्यांना करून दिली आहे.