‘ठाकरे बंधू’ एकत्र येण्याची घोषणा होताच भाजपची पहिली प्रतिक्रिया; “मराठी माणसाला गाफील…”; प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?

BJP’s first reaction : राज्यात सरकारने घेतलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीवरून मोठा विरोध करण्यात येत आहे. शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाने या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे. त्रिभाषा सूत्राविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ५ जुलै, तर शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ७ जुलैला मोर्चा निघणार असल्याची घोषणा ठाकरे बंधूंनी केली होती.
अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. उबाठाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल अशी मोठी घोषणा केली आहे. म्हणजेच ५ जुलैला एकच मोर्चा निघणार असून ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. यावर आता भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एका वाहिनीसोबत बोलताना ठाकरे बंधू एकत्र येण्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत त्यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
काय म्हणाले प्रसाद लाड
हिंदीची सक्ती केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण देखील दिलेले आहे की, हिंदी भाषा सक्तीची नाही. त्यामुळे मराठी माणसाची दिशाभूल करण्याचे काम ठाकरे करत आहेत. मराठीचा पुळका उद्धव ठाकरेंना ते ज्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यावेळी आलेला दिसला नाही. त्यावेळी हिरव्यांच्या खाली लोटांगण घालण्याचे काम हे करत होते, असा हल्लाबोल भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
मराठी माणसाला गाफील करून….
मराठी भाषेला आम्ही बोट देखील लावायला देणार नाही. हा आमच्या महायुती सरकारचा शब्द आहे. त्यामुळे ठाकरे ज्या पद्धतीच्या बाता मारत आहेत, या भुलथापा आहेत, अशी टीका देखील लाड यांनी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला गाफील करून त्यांना फसवण्याचे काम करत आहेत. मराठी माणसाच्या मागे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार खंबीरपणे उभे असल्याचे प्रसाद लाड म्हणाले आहेत.
हेही वाचा : अखेर ठरलं: मराठी अस्मितेसाठी एकजूट; 5 जुलैच्या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार! संजय राऊतांची मोठी घोषणा





