मुंबई, – सध्याच्या राजकीय पेचप्रसंगात भाजपने वेट अँड वॉच असे धोरण अवलंबले आहे. शिवसेनेतील बंडखोर गटाने ठोस पाऊल उचलल्यानंतरच भाजप जाहीरपणे ऍक्शन करणार असल्याचे समजते.
शिवसेनेतील बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गोत्यात आले आहे. त्या बंडामागे भाजप असल्याचा आरोप सत्तारूढ आघाडीकडून केला जात आहे. मात्र, आताच्या पेचप्रसंगाशी आपला संबंध नसल्याची भूमिका भाजपकडून वारंवार बोलून दाखवली जात आहे. भाजपच्या गोटात हालचाली सुरू असल्या तरी त्याबाबत पुरेशी गोपनीयता बाळगली जात आहे.
बंडामुळे सरकार फार काळ तग धरणार नाही अशी खात्री भाजपला वाटत आहे. तसे असले तरी सावधपणे पुढील हालचाली करण्याचे भाजपने ठरवल्याचे त्या पक्षातील सुत्रांनी अधोरेखित केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापर्यंत पोहचून बंडखोरांनी प्रथम ठोस पाऊल उचलावे. त्यानंतरच आपण उघडपणे सक्रिय व्हावे, अशी भाजपची रणनीती आहे. त्यामुळे सरकारला पाठिंबा नसल्याच्या बंडखोरांच्या कृतीची भाजपला प्रतीक्षा असल्याचे स्पष्ट होत आहे.