जळगाव – बंडखोरी करून भाजपासोबत सरकार बनवलेल्या शिवसेनेतील पाच मंत्र्यांना हटवणार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला. तसेच भाजपच्या हायकमांडने शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवण्याची भूमिका घेतली असून त्यात मंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवड्याभरापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात असताना एकनाथ खडसे यांनी शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना भाजप हटवणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
ते म्हणाले की, ठाकरे गटातील नेते, खासदार संजय राऊत यांनी नुकताच केला आहे. या पाच मंत्र्यांना हटविण्याचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे भाजपच्या यंत्रणेने पाठविला आहे. या पाच मंत्र्यांमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांना कसे हटवायचे हा मोठा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
जलजीवन मिशनमध्ये घोटाळा
गुलाबराव पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला आहे आणि त्यांच्या भ्रष्टाचाराचे रिपोर्टकार्ड दिल्लीत बसलेल्या वरिष्ठापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे त्यांना पदावरून हटवा अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठांनी घेतली असल्याचे समजते.
जलजीवन मिशनमध्ये पूर्णपणे कामे झालेली नाही आहेत. या कामांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील याचाही समावेश असल्याचे खडसे यांनी सांगितले.