सातारा – कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कोणतीही दैवी प्रतिमा भाजपला वाचवू शकत नाही. भाजपला हद्दपार करण्याचे मिशन तेथील जनतेने हाती घेतले आहे. त्यामुळे भाजपला “बजरंगबली’सुद्धा वाचवू शकणार नाही, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साताऱ्यात केली.
येथील कॉंग्रेस कमिटीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या हस्ते पटोले यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पटोले म्हणाले, “”लोकशाहीला न जुमानता भाजप एखाद्या मिशनला “लोटस मिशन’ असे नाव देते हे अत्यंत चुकीचे आहे.
आता कर्नाटकमधून भाजप परत जा असे मिशन तेथील जनतेने राबवले आहे. भाजपला कर्नाटक निवडणुकीत बजरंगबली सुद्धा वाचवू शकणार नाहीत. कारण बजरंगबली हे पूर्णपणे कॉंग्रेसच्या बाजूने आहेत. कर्नाटकमध्ये बजरंगबलीची मंदिरे बांधण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतलेला आहे. मणीपूरमध्ये आगीचा डोंब उसळलेला असताना भाजपचे देशपातळीवरील आणि राज्यपातळीवर नेते कर्नाटक निवडणुकीत प्रचारासाठी उतरले आहेत हे जनतेला पटलेले नाही.
” मी आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीचे आणि विचारांचे दर्शन घेण्यासाठी आलो. कर्मवीरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम सध्याच्या केंद्र सरकार व राज्य सरकारकडून सुरू आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे अशाच मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील अशी व्यवस्था निर्माण करण्याचे काम केले जात आहे.
जागोजागी पैसेवाल्या लोकांच्या अकॅडमी पाहायला मिळत आहेत. तिथे फक्त श्रीमंतांची मुले शिक्षण घेऊ शकतात, त्यामुळे महाराष्ट्रात कर्मवीरांचे विचार पुसून टाकण्याचे काम सुरू झाले आहे, अशी टीका त्यांनी केली. आगामी निवडणुकीत भाजप विरोधी लढण्याचे धारिष्ट्य जे जे पक्ष दाखवतील अशा समविचारी पक्षांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. याच महिन्यात जागावाटपासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समविचारी पक्षांशी चर्चा केली जाणार आहे, से त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
कॉंग्रेस पक्षाची बांधिलकी फक्त जनतेच्या प्रश्नांशी आहे, आमच्यावर कोण काय टीका करतो याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, “”लोकशाहीची व्यवस्था व संविधानाचा वापर योग्य हवा असे आमचे मत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना मदत देतो असे जाहीर केले होते. ती मदत शेतकऱ्यांना मिळाली का? हा एक प्रश्न आहे. राज्यामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला बेपत्ता झाल्या आहेत. ही आकडेवारी सध्याची पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांच्यासाठी चिंतेची आहे. ते आया बहिणींची रक्षा करू शकले नाहीत.”
===============