नाशिक – नाशिकमध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी झाडे तोडण्याच्या प्रस्तावित योजनेवरून भाजपवर हल्ला चढवत, सत्ताधारी पक्षाला शहरात रावण राज आणायचे आहे, असे ठाकरेसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. नाशिक महानगरपालिके निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. नाशिक महानगरपालिकेने साधूग्राम वसाहत उभारण्यासाठी शहराच्या तपोवन परिसरातील झाडे तोडण्याचा प्रस्ताव दिला होता. या निर्णयाला स्थानिक, पर्यावरण कार्यकर्ते आणि विरोधकांनी तीव्र विरोध केला होता. या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने १५ जानेवारीपर्यंत महानगरपालिकेच्या योजनेला स्थगिती दिली आहे. ठाकरे म्हणाले, जर भाजपच्या मनात राम असता, तर त्यांनी तपोवनातील झाडे तोडली नसती. त्यांना ती जमीन बिल्डरांना द्यायची आहे. पक्षाची हिंदुत्वाची भूमिका अधिक राजकीय असल्याचे म्हटले. त्यांना रावण राज आणायचे आहे. भाजपला महाराष्ट्राला गिळंकृत करून विकसकांना भेट म्हणून देण्याची भूक लागली आहे. ही भूक महाराष्ट्राला, शहरांना संपवण्याची आणि देशाला मागे नेण्याची आहे. तरुण आणि महिलांसाठी रोजगार नाही. जंगले आता सुरक्षित नाहीत आणि शहरांच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही, असे ते म्हणाले. तसेच, शहरात ठाकरेसेना, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांच्या आघाडीला आज अंतिम रूप दिले जाईल. त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत शहरात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची आपली कल्पना असल्याचे यावेळी सांगितले.