नगर – राज्यसभेच्या शपथविधी प्रसंगी घडलेल्या प्रकाराबाबत भाजप व व्यंकय्या नायडू यांनी माफी मागावी या मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.चोरमारे यांना देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, आनंद लहामगे, अर्जुन दातरंगे, सुरेश तिवारी, अमोल येवले, रामदास भोर, विशाल वालकर आदी उपस्थित होते.
बुधवारी (दि.22) जुलै रोजी राज्यसभेमधील नवनिर्वाचित निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
या शपथविधी दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांच्या शपथविधी नंतर राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करु नये व सदन माझे आहे, अशा प्रकारे नियम पाळावे, ही सूचना दिली.
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष असून, रयतेचे राजे आहेत. झालेल्या घटनेची नगर शहर शिवसेना तीव्र निषेध करते, भाजप पक्षाने व व्यंकय्या नायडू यांनी त्वरित माफी मागावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.