भोपाळ: कॉंग्रेस सरकारच्या कालावधीतील मध्यप्रदेशातील कर्जमाफी प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला आहे. या कर्जमाफीतून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याच्या संशयावरून ही चौकशी केली जाणार आहे, असे राज्याचे कृषिमंत्री कमल पटेल यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सत्तेवर आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती, त्यानुसार त्यांनी त्याची पूर्तता केली आहे. तथापि भाजपला यावर शंका आहे. या प्रकरणाची करून कमलनाथ यांना आम्ही तुरूंगात पाठवू असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार काय, असे विचारले असता ते म्हणाले की, कॉंग्रेसवाल्यांनी सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले आहे असे तुम्ही पत्रकारांनीच छापले आहे मग आता आम्ही पुन्हा वेगळी कर्जमाफी देण्याची गरज काय असा उलट सवाल राज्याचे कृषीमंत्री पटेल यांनी केला. कॉंग्रेसने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करूनच ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेस सोडली आहे, असा दावाही त्यांनी केला.