पणजी – दाब दबावाचे राजकारण करून, धमक्या देऊनही महाविकास आघाडीला तडा जात नाही ही भाजपची पोटदुखी आहे, असे सांगतानाच या सरकारचे स्टेअरिंग ठाकऱ्यांच्याच हाती आहे आणि राहील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राला कितीही वाकवण्याचा, झुकवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र अजिबात झुकणार नाही, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला. गोव्यात मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा इशारा दिला आहे.
आदित्य ठाकरे आणि अजित पवारांनी एकत्र विकास कामांची पाहणी केली. तसेच अजित पवार आणि आदित्य ठाकरे एकाच गाडीतून गेले. आदित्य यांनी स्वत: गाडी चालवली, याकडे संजय राऊत यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. उत्तम आहे. हीच भाजपची कळ आहे. भाजपच्या पोटात वेगवेगळ्या प्रकारची कळ याच कारणामुळे येते. महाविकास आघाडीचे नेते एकत्र असल्याने त्यांची पोटदुखी आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राऊत यांच्या संपत्तीबाबत भाष्य केले होते. त्यालाही त्यांनी उत्तर दिले. आधी तुमच्या संपत्या पाहा. माझी संपत्ती हवी असेल तर घेऊन जा. माझी अशी कुठली संपत्ती नाहीये. मराठी माणसाच्या हातात पैसा राहू नये, मराठा माणूस कंगाल राहवा यासाठीचं षडयंत्र सुरू आहे. याचं उत्तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.
राऊत यांनी महापालिकेची निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान भाजप नेते मोहीत कंबोज यांनी दिलं होतं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. राऊतांनी कुणाला उत्तर द्यावं हा प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. मी उत्तर दिलं तर माणूस मोठा होतो, असा टोला राऊत यांनी लगावला.