Riteish Deshmukh video : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभांना उपस्थिती दर्शवत आहेत. नुकतेच त्यांनी लातूर येथे आयोजित सभेला हजेरी लावली होती. या सभेतून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयी एक विधान केले आहे. ज्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या विधानानंतर विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख याने फेसबुकवरून व्हिडीओ शेअर करत संयमीपणाने प्रत्युत्तर दिले आहे. नेमकं काय म्हणाले रवींद्र चव्हाण? लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण शहरात आले होते. यावेळी त्यांनी सभा घेत भाषण केले. या भाषणातून रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित करताना दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल विधान केले. ते म्हणाले, “लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. हा उत्साह पाहून लक्षात येते की, लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, यात कोणतीही शंका नाही”. लोकांसाठी जगलेल्या माणसाची नावे मनात कोरलेली असतात लिहिलेले पुसता येते, कोरलेले नाही @Riteishd दादाचे अत्यंत कमी शब्दात समर्पक उत्तर 🙌🏻 pic.twitter.com/ibWfisA5Im — Pratik S Patil (@Liberal_India1) January 6, 2026 रितेश देशमुखचे प्रत्युत्तर त्यांनी केलेल्या या विधानंतर रितेश देशमुख याने फेसबुकवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, “दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेल्या असतात. लिहिलेलं पुसता येतं. कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र.” अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला संताप रवींद्र चव्हाण यांनी स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलाराव देशमुख यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते रोष व्यक्त करत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. “स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कुणी निर्माण झाला नाही. ” असे सपकाळ म्हणाले आहेत. हेही वाचा : ‘छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते’; भाजपच्या नेत्याच्या वक्तव्याने घमासान