मुंबई : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील सत्तेसाठी सुरू असणारी सूंदोपसुंदी अद्याप कायम आहे. सत्तास्थापनेसाठी या दोन्ही पक्षांनी आपले बी प्लॅन बनवले असल्याचे दोन्ही पक्षांच्या उच्चस्तरीय सुत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान सत्ता स्थापनेच्या या घटनांत राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार असून त्यादृष्टीने शरद पवार यांच्याकडे सर्व सुत्रे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शरद पवार यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक शनिवारी सायंकाळी मुंबईत बोलावली आहे. त्यासाठी अवकाळी नुकसान पाहणी दौरा अटोपता घेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पवार सोमवारी म्हणजे दि. चार रोजी दिल्लीत सोनीया गांधी यांची भेट घेतील. त्या भेटीत ते शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी सोनिया गांधी यांचे मन वळवण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार पवार रविवारचि दिल्लीला रवाना होतील.
राजकीय निरीक्षकांच्या मते, राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेसोबत सरकार स्थापन करू शकते. त्यास कॉंग्रेस बाहेरून पाठींबा देतील. सेनेच्या या बी प्लॅनमध्ये लहान पक्ष आणि अपक्षांना सामावून घेण्यात येईल. या सरकारमध्ये कॉंग्रेस थेट सहभागी होणार नाही; कारण पक्षाला पाठींबा देणाऱ्या काही घटकांना त्यामुळे दुखावावे लागेल, अशी त्यांना भीती वाटत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पवार यांची भेट घेतल्यानंतर गुरूवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली ासल्याचे ात्यंत विश्वासनीय सुत्रांनी सीांगतले.
शिवसेना आणि भाजपा यांच्यात गेली तीस वर्षे युती आहे. भाजपा आणि सेनेने ही विधानसभा निवडणूकही एकत्र लढवली. त्यात भाजपाला 105 तर सेनेला 56 जागा मिळाल्या. मात्र मुख्यमंत्री पदाची वाटणी आणि सत्तेत निम्मा वाटा या शिवसेनेच्या मागणीमुळे या दोन्ही पक्षांत मतभेदांची दरी निर्माण झाली. राष्ट्रवादीकडे 54 तर कॉंग्रेसकडे 44 जागा आहेत. त्यामुळे ही आघाडीसुध्दा बहुमत सिध्द करू शकते.
भाजपा मात्र शिवसेना पुन्हा चर्चेला येईल, अशा आशेवर आहे. सरकार स्थापनेसाठी खूपच कमी दिवस राहिल्याने आम्ही शिवसेनेनच्या प्रतिसादाची वाट पहात आहोत, असे भाजपाच्या एका वरीष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपा सेनेतील वादाचे मुद्दे लवकरच सोडवले जातील असे शनिवारी सांगितले.
शिवसेनेने फारच ताणून धरले तर सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा दावा करायचा. पक्षाला 15 अपक्ष आमदारांचा पाठींबा आहेच. त्याबळावर सरकार बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाईल, असेही पक्षातील सुत्रांकडून समजते.
दरम्यान भाजपाचे मित्रपक्ष असणाऱ्या रिपाइं, रासप आणि रयत क्रांती संघटना इ. पक्षांनी भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावे, अशी विनंती राज्यपालांना भेटून केली. त्यांच्या निवेदनात भाजपाकडे 105 आमदार असून त्यांना 15 अपक्षांचा पाठींबा आहे, याकडे लक्ष वेधले आहे, असे राज भवनच्या सूत्रांनी सांगितले.
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात खूप फरक आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी या आपल्या पक्षाच्या उमेदवारांना शिवसेनेने पाठींबा दिला होता. जर शिवसेनेने पाठींबा मागितला तर पक्षाने तो द्यावा, असे सुचवणारे पत्र पक्षाचे राज्यसभेतील खासदार हुसेन दलवाई यांनी कॉंग्रेस पक्षाध्यक्ष सोनीया गांधी यांना पाठवले आहे.