मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजप- सेना युतीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्यावेळी ठरला होता. तोच कायम असून दोन दिवसांत युतीचं ठरेल, असे जाहीर केले. तर युतीच्या जागावाटपाचं अजून निश्चित काही ठरलं नसल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याने युती बाबत संभ्रमाचे वातावरण कायम आहे. त्यातच भाजपा आणि शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका आज झाल्या.
शिवसेनेचे मंत्री आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवनात झाली. त्यात युती होईल पण सन्मानजनक जागा दिल्या तरच होईल. अन्यथा वेगळा विचार करू, असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पत्रकारांशी श्री. ठाकरे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, युती होणार हे निश्चित आहे. युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्यूला लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच ठरला आहे. त्यानुसार जागावाटप होईल. ते दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल.
मुंबइत भाजपा निवडणूक समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात प्रचाराचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर, चंद्रकांत पाटील पत्रकारांना म्हणाले, युती होणार हे निश्चित. मात्र जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय ाद्याप झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्यातलि चर्चेनंतर जागावाटप निश्चित केले जाईल.
राजकीय वर्तूळात मात्र 126 – 162 जागांच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना तयार झाली असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे अनिल देसाई यांनी बैठकीला जाण्यापुर्वी युती होईल असे सांगताना समाधानकारक जागा मिळाल्या तरच युती होईल असे स्पष्ट केले. मात्र समाधानकारक म्हणजे किती हे स्पष्ट केले नाही. त्यामुळे युतीच्या संभाव्यतेबाबत अद्याप साशंकता व्यक्त होत आहे.