मुंबई – राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचातय निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. या निकालानंतर सर्वच पक्षांकडून आमच्या सर्वाधिक ग्रामपंचायती निवडून आल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात भाजपच सर्वाच मोठा पक्ष ठरल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छेद दिला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना तिन्ही पक्षांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका लढवलेल्या आहेत. सर्वात समाधानाची बाब ही आहे, या सर्व गडबडीत भाजपाचं अस्तित्व फार मर्यादित राहिलं आहे. राज्यात महाआघाडीसमोर भाजपा २० टक्के देखील नाही”, असं जयंत पाटील यांनी आज माध्यामांशी बोलताना म्हटले.
दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष सर्वात जास्त जागांवर विजयी झाला असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील निकालाची माहिती आपल्याकडे आहे. १३ हजार २९५ ग्रामपंचायतीपैकी ३ हजार २७६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला आहे. काँग्रेसला १ हजार ९३८ जागांवर यश मिळालं आहे. भाजपा २ हजार ९४२ जागांवर विजयी झाली आहे व शिवसेना २ हजार ४०६ जागांवर विजयी झाली आहे. आकडे बोलके असून राष्ट्रवादी काँग्रेस हा तळागाळातील पक्ष असल्याचे पाटील यांनी म्हटले.
एकूणच महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजप २० टक्केही नाही, असं पाटील यांनी नमूद केले. दुसरीकडे भाजपकडून राज्यात सर्वाधिक ग्रामपंचायती निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.