पाटणा –निवडणूक वर्षात देशभरातून भाजपचे नेते बिहारमध्ये राजकीय पर्यटनासाठी येतील. खोट्या घोषणा आणि मोठमोठे दावे करतील. मात्र, केंद्र सरकारने मागील ११ वर्षांत गुजरातला किती निधी दिला अन् बिहारला किती ते काही सांगणार नाहीत, अशा शब्दांत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पलटवार केला. शहा यांनी रविवारी बिहारचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटूंबीयांवर टीकेची झोड उठवली. लालू आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या आधीच्या राजवटींची त्यांनी खिल्ली उडवली. शहा यांच्या टीकेला लालूपुत्र तेजस्वी यांनी सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिले. राजद आणि लालूंवरील टीका निराधार आहे. महत्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करत आहेत. गुजरातच्या तुलनेत बिहारला काय दिले ते भाजपच्या नेत्यांनी सांगावे. उपजीविकेसाठी बिहारमधून मोठ्या प्रमाणात इतरत्र स्थलांतर होते. ते रोखण्यासाठी बिहारमधील एनडीए सरकारने कुठली पाऊले उचलली? किती तरूणांना रोजगार दिला, असे प्रश्नही त्यांनी विचारले. बिहारमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. त्यामुळे त्या राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.