मुंबई – राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने पदवी अभ्यासक्रमाच्याअंतिम वर्षाच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परिक्षेविनाच पदवी देण्याच्या या निर्णयावर आता टीका होताना दिसत आहे. अशातच आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारच्या परीक्षांबाबतच्या निर्णयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
याबाबत भातखळकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून परीक्षा रद्द करण्यास विद्यापीठांच्या कुलगुरुंचा विरोध असतानाही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे एक वृत्त ट्विट केले असून या वृत्तसोबतच त्यांनी, “जनमताशिवाय राजा आणि परीक्षेशिवाय पदवी… अजब तुझे सरकार” असा संदेश लिहीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
जनमताशिवाय राजा आणि परीक्षेशिवाय पदवी… अजब तुझे सरकार pic.twitter.com/bEveepLv2k
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 2, 2020
तत्पूर्वी, विद्यार्थ्यांना परिक्षांसाठी फार ताटकळत न ठेवता त्यांच्या अंतिम वर्षांच्या परिक्षा रद्द करून त्याऐवजी त्यांनी आत्ता पर्यंत झालेल्या सेमिस्टर परिक्षांमधील गुणांच्या सरासरी गूण देऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मधील संवादाच्या कार्यक्रमात बोलताना दिली होती.