नवी दिल्ली – जागतीक बाजारात क्रुडचे दर वाढत असल्याचे कारण सांगून भारतातील तेल कंपन्या गेल्या काही दिवसापासून इंधनाच्या दरात एकतर्फी वाढ करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या मनात असंतोष वाढत आहे. त्याचबरोबर ही दरवाढ गरजेपेक्षा कितीतरी जास्त असल्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रम्हण्यन स्वामी यांनी सांगितले आहे. पिळवणुकीलाही काही मर्यादा असतात असे स्वामी यांनी म्हटले आहे. ही दरवाढ ताबडतोब परत घेण्याची मागणी त्यानी केली.
स्वामी म्हणाले की, तेल शुध्दीकरण कारखान्यातून जेव्हा पेट्रोल बाहेर येते तेव्हा त्याची किमत केवळ 30 रुपये प्रती लिटर इतकी आहे. मात्र सध्या ग्राहकाला पेट्रोलसाठी 90 रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजे 30 रूपयाच्या पेट्रोवर सध्या एकूण कर 60 रुपये म्हणजे 200 टक्के कर आहे. इतका कर लावणे बरोबर नाही, असे स्वामी यानी सांगितले. गेल्या 18 दिवसात पेट्रोलचे दर 2.65 रुपयांनी तर डिझेलचे दर 3.40 रुपयानी वाढविण्यात आले आहेत.
इंधनावर मूळ उत्पादन शुल्क, विषेश उत्पादन शुल्क आणि रस्ते व पायाभूत सुविधा कर लावले जातात. या करात गेल्या एक वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. सरकारला दध्या जास्त महसूल हवा आहे. कारण सरकारला लॉक डाऊनच्या काळात बराच खर्च करावा लागला आहे. त्यामुळे सरकारची वित्तीय तूट वाढयाची शक्यता आहे. बराच काळ जीएसटी संकलन कमी झाले होते. त्यामुळे राज्याना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्यांना कर्ज घ्यावे लागले आहे.
विविध राजकीय पक्ष आणि ग्रहक इंधनाचे दर कमी करण्याची गरज आहे, असे सांगत असताना सरकार किंवा इंधन कंपन्यानी मात्र यावर प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे. लोकांनी इंधनाचा वापर वाढविल्यास त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल. त्यामुळे इंधनाचा वापर वाढावा याकरता प्रयत्न करण्याची गरज असल्याचे काही जण सांगतात.