पुणे : दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत भाजप नेत्यांकडून चूकीची विधाने करून शेतकऱ्यांचा अपमान केला जात आहे. ही बाब निंदनीय असून भाजपने या प्रकरणी आत्मपरिक्षण करावे अशी टिका कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे. तसेच या आंदोलनाप्रकरणी सेवा निवृत झालेले काही शासकीय अधिकारी सत्तापक्षाचे बटीक बनले असून ही लोकशाहीची शोकांतिका असल्याचे तिवारी यांनी नमूद केले आहे.
तिवारी म्हणाले की, भाजपकडून किसान आंदोलनास विदेशी कटाचा भाग़ ठरविण्याची केवीलवाणी वक्तव्ये केली जात आहेत. तर काही सेवा निवृत्त प्रशासकीय अधिकारी या आंदोलनामागे, चीन पाकिस्तानचा हात आहे, शहरी नक्षलवाद्यांचा हात असल्याची शक्यता वर्तवित बिनबुडाचे आरोप करत आहेत.
वास्तविक पाहता केंद्रशासनाच्या कृषी धोरणाविरोधात देशातील शेतकरी एकजूट झाले असून त्यांची ताकद दिल्लीत दिसून येत आहे. त्यामुळे, भाजपची कोंडी झाली असून अडचणीत सापडलेल्या भाजप नेत्यांकडून अशा प्रकारे आंदोलनात बाहेरील शक्तीचा हात असल्याची वक्तव्ये केली जात असून या लढयाची अवहेलना केला जात असून या वक्तव्यांचा निषेध करावा तेवढा कमी असल्याचे तिवारी यांनी सांगितले.