मुंबई : एकनाथ शिंदे यांचे बंड ठाकरे सरकारवर भारी पडेल असे चित्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहून वाटते आहे. कारण सरकार अल्पमतात आले असून आपल्याकडे जास्त आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर सरकारने बहुमत सिद्ध करावं असं खुले आव्हान देखील एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारला दिले आहे. लवकरच राज्यात सत्तांतर होणार असून भाजप सरकार स्थापन करणार असल्याच्या राजकीय चर्चांनी वेग धरला आहे.
महापूजा फडणवीसांकडूनच
अशातच भाजपच्या एका खासदाराने मोठे विधान केले आहे. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दावा केला आहे की, येत्या दोन दिवसात राज्यात भाजपचे सरकार येईल. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. एवढेच नाही तर ते पुढे असेही म्हणाले आहेत की आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची महापूजा ही फडणवीसच करतील. शिवाय चिखलीकर यांनी असेही संगितिले आहे की केवळ आमदारच नाही तर १०-१२ खासदारही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येतील.
आमदारांच्या केसालाही धक्का लागणार नाही
यासोबतच संजय राऊत यांच्या काही वक्तव्यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचं बंडखोर आमदारांनी म्हटलं होतं. यानंतर केंद्राने त्यांना आणि कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. याबाबतही चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या केसालाही धक्का लागणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यात पुन्हा भाजप सरकार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. बंडखोर आमदारांच्या पाठीशी भाजप असल्याच्या देखील चर्चा आहेत. राजकारणाच्या या पटलावर नक्की काय होणार हे येणारा काळच सांगेल.