नवी दिल्ली : कॉंग्रेसने मध्यप्रदेशातील राजकीय घडामोडींचा संदर्भ देऊन भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राज्यसभा निवडणुका तोंडावर असतानाच भाजपला राज्य सरकारे अस्थिर करण्याचा ज्वर चढला असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.
मध्यप्रदेशात कॉंग्रेस आमदारांची फोडाफोडी करून कमल नाथ सरकार पाडण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच कमल नाथ सरकारला पाठिंबा असणाऱ्या काही आमदारांचे भाजपने अपहरण केल्याचा आरोप कॉंग्रेसने बुधवारी केल्याने राजकीय खळबळ उडाली.
त्यानंतर मध्यप्रदेशमधील घडामोडींकडे बोट करत कॉंग्रेसने गुरूवारी येथे भाजपवर टीकेची झोड उठवली. त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद पुढे सरसावले. केंद्रात सत्तेवर आल्यापासून भाजप एकपाठोपाठ एक करून प्रत्येक राज्यात लोकशाही संपवू पाहत आहे, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
तर मध्यप्रदेशातील सरकार पाडण्यासाठी भाजपने माफियांशी हातमिळवणी केली असल्याचे कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले.
कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधिररंजन चौधरी यांनी हुकूमशहाप्रमाणे वागणाऱ्या मोदी सरकारविरोधात एकवट्याचे आवाहन विरोधी पक्षांना केले.